शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला संताप व्यक्त
। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल महापालिकेने सिडकोकडून हस्तांतरित करून घेतलेल्या कोपरा येथील सेक्टर 10 मधील स्मशानभूमीच्या पाण्याच्या टाकीत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह गेल्या पंधरा दिवसांपासून ते महिनाभरापासून टाकीत पडून असावा, असा संशय व्यक्त केला जात असून या काळात अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांनी त्याच टाकीतील पाण्याचा वापर केल्याने महापालिका प्रशासनाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संताप व्यक्त केला आहे.
कोपरा गावातील स्मशानभूमीचा वापर प्रामुख्याने स्थानिक ग्रामस्थांकडून केला जातो. गुरुवारी (दि. 11) गावातील संतोष तांबोळी यांच्या 27 वर्षीय पुतण्याचा मेंदूतील रक्तस्रावाने मृत्यू झाला होता. या 27 वर्षी तरूणाचा अंत्यविधी करण्यासाठी तांबोळी यांच्यासह अनेक नातेवाईक स्मशानभूमीत गेले असता परिसरात उग्र दुर्गंधी येत होती. मात्र, त्याकडे विशेष लक्ष देण्यात आले नाही. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.12) पुढील विधीसाठी पुन्हा स्मशानभूमीत तांबोळी यांचे नातेवाईक गेल्यावर त्यांना पाण्यातून दुर्गंधी अधिक तीव्र येऊ लागल्याने ग्रामस्थांनी परिसराची पाहणी केली. त्यांना काही सापडले नाही. महापालिकेच्या कर्मचाऱ्याला तेथे बोलावल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या टाकीत डोकावून पाहिल्यानंतर त्यांना कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. खारघरचे प्रभाग अधीक्षक जितेंद्र मढवी यांना तातडीने बोलावल्यानंतर त्यांनी खारघर पोलिसांना घडलेला प्रकार सांगीतला. पोलीस आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने जेसीबीच्या साहाय्याने टाकी फोडून कुजलेल्या मृतदेहाचे अवशेष बाहेर काढण्यात आले. हे अवशेष शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान याबाबतची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गटनेत्या लिना गरड यांना समजताच त्यांनी पनवेल महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराबाबत संताप व्यक्त केल आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, संबंधित स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे किंवा सुरक्षा रक्षक नसल्याने मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत. तीन दिवस उलटूनही मृतदेह कोणाचा आहे, याचा उलगडा लागलेला नाही. खारघर पोलीस याबाबत तपास करत आहेत. या दरम्यान शिवसेना (ठाकरे) गटाने या प्रकरणी महापालिका प्रशासनावर टीका करत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व स्मशानभूमींमध्ये सुरक्षा रक्षकांची नियुक्ती आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.







