पूर्वीची पद्धत लागू करण्याची मागणी
| आगरदांडा | प्रतिनिधी |
महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजस्व अभियानांतर्गत वारस नोंद करण्याच्या विद्यमान प्रक्रियेमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिरंगाईचा सामना करावा लागत असल्याने पूर्वीप्रमाणेच स्थानिक स्तरावर वारस पंचनामा करून नोंदी करण्याची मागणी पुढे आली आहे. यासंदर्भात मुरुड येथील ज्येष्ठ समाजसेवक उदय हरिश्चंद्र चौलकर यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री तसेच स्थानिक आमदारांना निवेदन पाठवले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पूर्वी मयत खातेदाराच्या गावातील तलाठी आणि महसूल कर्मचारी प्रत्यक्ष घरी जाऊन पंचनामा करून वारस नोंद प्रक्रिया पूर्ण करत असत. त्यामुळे सातबारा उताऱ्यावर वारसांची नोंद अल्पावधीत होत होती. मात्र, सध्याच्या बदललेल्या प्रक्रियेनुसार एखाद्या व्यक्तीचा मृत्यू परगावी झाला असल्यास त्या ठिकाणच्या महसूल कार्यालयातून स्वतंत्र पंचनामा करून अहवाल संबंधित गावाच्या महसूल कार्यालयाकडे पाठवावा लागतो. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ ठरत आहे.
यामुळे वारसांना विविध महसूल कार्यालयांचे वारंवार हेलपाटे मारावे लागत असून, कागदपत्रांची देवाणघेवाण आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे वारस नोंदीसाठी अनेकदा वर्षभराहून अधिक कालावधी लागत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करत नागरिकांना वारस नोंदीसाठी सतत पाठपुरावा करावा लागत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे.
मयत व्यक्तीचा अधिकृत मृत्यू दाखला उपलब्ध असताना पुन्हा स्वतंत्र पंचनामा करण्याची आवश्यकता नसल्याचे नमूद करत, नागरिकांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे पूर्वीप्रमाणे स्थानिक महसूल अधिकाऱ्यांकडून वारस नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वारस नोंदीची प्रक्रिया सुलभ, जलद आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी शासनाने तातडीने विद्यमान पद्धतीत सुधारणा करून पूर्वीची कार्यपद्धती पुन्हा लागू करावी, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.







