सर्वसाधारण सभेत तू-तू, मै-मै
| पेण | विशेष प्रतिनिधी |
पेण नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील दूषित व गाळयुक्त पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून सत्ताधारी सदस्यांमध्येच जोरदार शाब्दिक चकमक झाली. शहरात अनेक दिवसांपासून लालसर व गाळयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, याच मुद्द्यावर सभागृहात गदारोळ निर्माण झाला.
पहिल्याच पावसात पेण नगरपालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्याचा आरोप सदस्यांनी केला. शहरातील सर्व भागांत लाल रंगाचे, गाळयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांना पोट व घशाच्या आजारांचा सामना करावा लागत असल्याची बाब सभागृहात उपस्थित करण्यात आली. कोट्यवधी रुपयांची विकासकामे होत असताना नागरिकांची मूलभूत गरज असलेला शुद्ध पाणीपुरवठा करण्यात नगरपालिका अपयशी ठरत असल्याची टीका करण्यात आली.
सभेदरम्यान नगराध्यक्षांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमदार रवीशेठ पाटील प्रयत्नशील असल्याचे सांगितले. मात्र, अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या मूळ प्रश्नावर ठोस भूमिका किंवा उपाययोजना न मांडल्याने सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. दरम्यान, बांधकाम सभापती स्मिता पेणकर यांनी अधिकाऱ्यांकडून आपल्या आदेशांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याची खंत व्यक्त केली. आपल्या पत्रांनाही केराची टोपली दाखविली जात असल्याचा आरोप त्यांनी सभागृहात केला.
सत्ताधारी नगरसेविका पल्लवी कालेकर यांनी या संदर्भात लेखी तक्रार सादर केली. तसेच ज्येष्ठ नगरसेविका मालती म्हात्रे आणि सभापती कलावती पाटील यांनीही विकासकामे रखडण्यामागे अधिकारी वर्ग जबाबदार असल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींमधील अंतर्गत नाराजीचे पडसाद सभागृहात उमटले असून, त्याचा फटका अधिकारी वर्गाला बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. नगराध्यक्षांनीही अनेक बाबींवर अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मात्र, सभेच्या अखेरीस शहरातील अशुद्ध व गाळयुक्त पाणीपुरवठ्याबाबत ना नगराध्यक्षांकडून ठोस उत्तर मिळाले, ना अधिकारी वर्गाकडून प्रभावी उपाययोजना जाहीर करण्यात आली. त्यामुळे नागरिकांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न कायमच प्रलंबित राहिल्याने गरमागरम वातावरणात सर्वसाधारण सभा संपन्न झाली.







