नियोजनासाठी शेकापची बैठक
| खोपोली | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन यंदा खालापूर येथे साजरा होणार असून, या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. वर्धापनदिनाच्या नियोजनासाठी खालापूर येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
जिल्हा महिला आघाडी प्रमुख शिवानी जंगम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत कार्यक्रमाच्या विविध नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कर्जत-खालापूर विधानसभा अध्यक्ष संतोष जंगम, ज्येष्ठ नेते रामचंद्र देशमुख, तालुका चिटणीस किशोर पाटील, संतोष पाटील, भूषण कडव, प्रवीण लाले, राजू अभाणी, जितेंद्र रावळ यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
सत्तेच्या मोहापायी विचारांना तिलांजली देणाऱ्या आजच्या राजकारणात विचारांची मशाल हातात घेऊन ठामपणे उभा असलेला शेतकरी कामगार पक्ष 2 ऑगस्ट 2026 रोजी खालापूरच्या भूमीत आपल्या वर्धापन दिनानिमित्त पुन्हा एकदा इतिहास घडविण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रीय महामार्गालगत जुन्या राशी पेट्रोल पंपाच्या विस्तीर्ण परिसरात संपन्न होणारा हा मेळावा केवळ पक्षाचा वर्धापन दिन नसून पुरोगामी विचारांचा, संघर्षाचा आणि जनतेच्या हक्कांचा प्रखर एल्गार ठरणार आहे.
संपूर्ण परिसरात लालबावट्याची उभारणी सुरू असून, शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची फौज रात्रंदिवस झटत आहे. रायगड जिल्हा चिटणीस सुरेश खैरे आणि माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या देखरेखीखाली प्रत्येक नियोजनाला अंतिम स्वरूप दिले जात आहे. याचबरोबर महिला आघाडीच्या नेत्या सुप्रिया पाटील, पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, ॲड. मानसी म्हात्रे, शिवानी जंगम तसेच युवा नेतृत्व अतुल म्हात्रे हे देखील कार्यकर्त्यांसह नियोजन, जनसंपर्क आणि संघटनात्मक तयारीत सक्रिय सहभाग घेत असून, वर्धापन दिन यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. खालापूरची भूमी पुन्हा एकदा लालबावट्याच्या साक्षीने दणाणून जाणार, अशी उत्सुकता सर्वत्र व्यक्त होत आहे.
आज राजकारणात विचारांपेक्षा पक्षांतर, सत्तासमीकरणे आणि स्वार्थाची स्पर्धा अधिक दिसते. अशा वेळी शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित आणि सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे. विधानसभेतील किंवा लोकसभेतील आकड्यांनी विचारांची उंची मोजली जात नसते. विचार जिवंत असतात ते कार्यकर्त्यांच्या रक्तात, संघर्षात आणि जनतेच्या विश्वासात. आणि हेच वास्तव 2 ऑगस्टला खालापूरमध्ये पुन्हा एकदा दिसणार आहे.
शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन हा प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आषाढी वारीइतकाच पवित्र आणि प्रेरणादायी सोहळा असतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे हजारो कार्यकर्ते हा केवळ मेळावा गाजवणार नाहीत, तर पुरोगामी राजकारणाची ताकद अजूनही संपलेली नाही, हा ठाम संदेश महाराष्ट्राला देणार आहेत. या व्यासपीठावरून देशातील सध्याच्या राजकीय घडामोडी, लोकशाहीवरील वाढती आव्हाने, शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांकडे होत असलेले दुर्लक्ष तसेच विचारशून्य राजकारणावर थेट प्रहार होणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. सत्ता बदलू शकते, चेहरे बदलू शकतात; मात्र शोषितांच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका बदलत नाही, हा शेकापचा वारसा पुन्हा एकदा बुलंद होणार आहे. 2 ऑगस्ट रोजी खालापूरमध्ये उसळणारे लालबावट्याचे हे वादळ केवळ एका पक्षाचा कार्यक्रम ठरणार नाही, तर संघर्ष, विचार आणि जनतेशी असलेली नाळ अजूनही तितकीच जिवंत आहे, याचा दमदार पुरावा ठरणार आहे. बदलत्या राजकारणात विचारांची गरज संपलेली नाही; उलट ती अधिक तीव्र झाली आहे, हेच या वर्धापन दिनातून महाराष्ट्राला पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. बैठकीत कार्यक्रमस्थळी आसनव्यवस्था, वाहनतळ, भोजन व्यवस्था, स्वागत तसेच इतर नियोजनासाठी विविध समित्या स्थापन करून जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी, शेकापच्या वर्धापनदिनाचे यजमानपद खालापूर तालुक्याला मिळणे ही कार्यकर्त्यांसाठी अभिमानाची बाब असून, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन केले. खालापूर तालुक्यात होणारा हा मेळावा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.







