। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
राज्यपरिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातील 2146 कर्मचार्यांना सुधारित वेतन श्रेणी प्रमाणे मागील नोव्हेंबर महिन्याचे वेतन जमा करण्यात आले आहे. परिवहन मंत्र्यांनी दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कर्मचार्यांना पगार देऊन पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग एसटी विभागांमध्ये नियमित 2100 बसफेर्या धावत होत्या. मात्र, कोरोना कालावधीमध्ये 1500 फेर्यांचे नियोजन करण्यात आले होते. या विभागाकडे 2146 कर्मचारी होते. संपकाळात त्यातील काही कर्मचार्यांचे निलंबन झाले आहे. तर काही 30 नोव्हेंबरला सेवानिवृत्त झाले. यामुळे सध्या स्थिती एसटी विभागाकडे 1995 कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, 1454 कर्मचारी हे संपाच्या बाजूने आहेत. एसटी महामंडळाच्या वतीने परिवहन मंत्र्यांनी कर्मचार्यांना टप्प्याटप्प्यात वेतन श्रेणी वाढविणे बाबतची घोषणा यापूर्वी केली होती. त्याची अंमलबजावणी नोव्हेंबरच्या पगारापासून झाली आहे.
एसटीच्या कर्मचार्यांनी या विभागांमध्ये 8 नोव्हेंबर पासून संप पुकारला. याला शंभर टक्के प्रतिसाद लाभला. तत्पूर्वी जे कर्मचारी 1 ते 7 नोव्हेंबर या कालावधीमध्ये सेवा बजावली होती. अशा सर्व कर्मचार्यांचे वेतन सुधारित पद्धतीने अदा करण्यात आले आहे अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकार्यांकडून देण्यात आली. जिल्ह्यामध्ये एसटीची पहिली बस सेवा सोमवारी (ता. 6) दुपारी दोन वाजता कणकवली ते सावंतवाडी या मार्गावर सोडण्यात आली. या बससेवेमधून 24 प्रवाशांनी लाभ घेतला. दरम्यान आज कणकवली ते फोंडा या मार्गावर एसटी बस सुरू करण्याचा प्रयत्न झाला. या बसमध्ये ही किरकोळ प्रवासी होते. कणकवली ते फोंडा या मार्गावर जे प्रवासी एसटीला हात दाखवतील त्यांना पुढे घेऊन जाणार आहेत. त्यानंतर फोंडाघाट येथून परतीचा प्रवास कणकवलीच्या दिशेने होणार आहे.
रायगडातील सातशे कर्मचार्यांना फायदा
नविन वेतनवाडीचा रायगडातील सातशे कर्मचार्यांना फायदा झाला आहे. संपातीन 700 कर्मचारी सरकारच्या आवाहानानुसार पुन्हा कामावर आल्याने त्यांना ही वेतनवाड मिळणार असल्याचे विभागीय नियंत्रक अनघा बरटक्के यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात अद्यापही मुरूड डेपो पुर्णपणे बंद आहे तर अलिबाग डेपोेतुन दोन ते तीन फेर्या सुरू झाल्या आहेत तर अन्य डेपोतुन दिडशे फेर्या होत आहेत असे त्या म्हणाल्या.
दरम्यान जिल्ह्यातील 102 एसटी कर्मचार्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली असून 380 जणांचे निलंबन करण्यात आले आहे. तर 650 कर्मचारी कामावर पुन्हा हजर झाले आहेत. जिल्ह्यात तुरळक स्वरुपात सुरु असलेल्या बससेवेतून आतापर्यंत 36 लाखांचा व्यवसाय करण्यात आला आहे.