। अलिबाग । प्रतिनिधी ।
डावी विचारसरणी ही सामाजिक न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांवर आधारित असल्याने ती कधीच मृत्यू पावणार नाही, असे प्रतिपादन ॲड. गौतम पाटील यांनी केले. शेतकरी कामगार पक्षाचे नेतृत्व आता युवा पिढीकडे आले असून, नव्या उमेदीने पक्षाची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना सरकारी यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर टीका केली. “सरकारी यंत्रणेची वर्तणूक लोकशाहीला साजेशी नसून विविध स्तरांवर सरकारी व्यवस्थेचा गैरवापर सुरू आहे. यावेळी त्यांनी सामाजिक परिवर्तनासाठी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज अधोरेखित केली. सामाजिक समता, शिक्षण आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था उभी करण्यासाठी युवा पिढीने पुढे यावे,” असे आवाहनही त्यांनी केले.







