। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पश्चिम घाटाचा विस्तिर्ण पट्टा, विपुल जैवविविधता व डोंगरदर्यांनी वेढलेला आणि ऐतिहासिक वारशांचा ठेवा म्हणून रायगड जिल्हा ओळखला जातो. मात्र येथे वारंवार लागणार्या वणव्यामुळे वनसंपदा व पशू-पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी विळे भागाड एमआयडीसी भागातील डोंगरावर व माळरानावर प्रचंड मोठा वणवा लागला होता. येथील स्थानिक पर्यावरण व निसर्ग अभ्यासक राम मुंढे यांनी या भागाची पाहणी केली असता या वनव्यामध्ये ठिपकेवाली मुनिया आणि इतर पक्षांची घरटी पूर्णपणे जळून गेली आहेत. शिवाय पूर्ण विकसित झालेली अंडी देखील जळाली आहेत. अशाच प्रकारचे वणवे ठिकठिकाणी लागणे सुरू झाले आहे. पालीतील सरसगड किल्ल्यावर मागील वर्षी तब्बल 6 वेळा वणवा लागला होता, यामध्ये नव्याने लावलेले रोपे व वृक्ष जळून खाक झाली होती. शिवाय येथील माकडे, वानरे व पक्ष्यांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला. तसेच त्यांचा अधिवास देखील नष्ट झाला. जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक वास्तू आणि किल्ल्यांवरील हे वणवे या ऐतिहासिक वस्तूंना देखील नुकसान पोहचवत आहेत. सध्या अशा वनव्यांना मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. गवत जळल्याने गवतावर अवलंबुन असणार्या गुरे-ढोरांवर उपासमारीची वेळ येते. मोठ्या प्रमाणात सजीव सृष्टीचे नुकसान होते. या वणव्यांवर नियंत्रण आणणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच वनविभागाने हि बाब गंभीरतेने घेवून तत्काळ उपायोजना करणे आवश्यक आहे.
ठोस उपाययोजनांची गरज
वनविभाग, निसर्गप्रेमी व आदिवासी विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती करण्याची गरज आहे. तसेच दृकश्राव्य माध्यमांद्वारे वनव्यांमुळे होणारी हानी सर्वांसमोर आणली गेली पाहिजे. लोकांनी देखील स्वयंस्फूर्तीने वणवे रोखणे व स्वतः लावणार नाही यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
- नोव्हेंबर अखेरपासून व मार्च नंतर पानगळ सुरू झाल्यावर या दोन वेळा जिल्ह्यात वणवे लागतात. यावेळी पक्षांचा विणीचा हंगाम असतो. त्यामुळे पक्षी, त्यांचा अधिवास, त्यांची पिल्ले आणि अंडी नष्ट होतात. तसेच वणव्यामुळे महत्वाची जैवविविधता धोक्यात येते. मधमाशी तसेच इतर कीटक, रानफुले, मृदा आदींना देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या वणव्याची झळ बसते. – समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, कांदळवन, अलिबाग.