सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला
मुलभूत सुविधांसाठी मतदार राजा आग्रही
रायगडातील सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 21 डिसेंबरला होत आहेत.या निवडणुकांकडे अवघ्या जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिलेल आहे. राजकीयदृष्ट्या अतिशय जागरुक असलेल्या रायगडात निवडणुका आल्या की सर्वच राजकीय पक्ष सत्ता मिळविण्यासाठी सज्ज होतात.आरोप,प्रत्यारोपांच्या फैर्या झडू लागतात.आश्वासनांची खैरात होते.त्यातून मग रायगडचा सुज्ञ मतदार आपल्याला हवे तेच सरकार निवडतो.आता सुद्धा हेच सुरु आहे.रायगडातील शेकाप,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस,मनसे आदी प्रमुख राजकीय पक्ष अस्तित्वासाठी झटू लागल्याचे दिसत आहे.विकासाची ग्वाही मतदारांना देत आहेत. त्यातून मतदार राजा पुढील पाच वर्षाचे आपल्या नगरपंचायतींचे कारभारी निवडणार आहे.निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सहाही नगरपंचायतींचा हा लेखाजोखा
![](http://krushival.in/grygrars/2021/12/WhatsApp-Image-2021-12-19-at-5.32.36-PM-1024x460.jpeg)
खालापुरात शेकापच बाजी मारणार
मुंबई -पुणे महामार्गावरील एक प्रमुख शहर म्हणून खालापूर ओळखले जाते. अष्टविनायकाचे क्षेत्र असलेल्या महडनजीकच खालापूर असल्याने या नगरीचे महत्व वाढत चाललेले आहे.खालापूर नगरपंचायतीची पहिली निवडणूक सन 2017 मध्ये घेण्यात आली. पहिल्याच निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवित खालापूरमध्ये सत्ता प्रस्थापित केली होती.खालापूरच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा होण्याचा बहुमान देखील शेकापच्या धडाडीच्या नेत्या शिवानी जंगम यांना मिळाला.शेकाप सरचिटणीस आम.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेकाप नेते संतोष जंगम यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी विकासाची सुरुवात केली.गेल्या पाच वर्षात विविध माध्यमातूून सरकारी निधी उपलब्ध करुन त्याद्वारे खालापूरमध्ये मूलभूत विकासाची कामे करण्यात शेकाप यशस्वी झाला.त्या विकासाच्या जोरावरच शेकाप पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहे.आता होत असलेल्या निवडणुकीसाठी एकूण 16 जागांसाठी मतदान होत आहे.येथील एक जागा ओबीसीसाठी राखीव होती.पण नवीन निर्णयानुसार ही जागाही आता खुल्या प्रवर्गातून लढविली जाणार आहे.त्या प्रभागाची निवडणूक 18 जानेवारीला होणार आहे.या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने स्वबळावर 16 उमेदवार उभे केलेले आहेत.तर शिवसेना,राष्ट्रवादीची युती झालेली असून,शिवसेनेने 9 तर राष्ट्रवादीने 3 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविलेले आहेत.मनसे 9 आणि भाजप 7 जागांवर राजकीय भवितव्य अजमावित आहे. शेकाप विकासकामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहे.तर विरोधकांकडे कोणताच ठोस मुद्दा नसल्याने केवळ आरोपांची फैर्या झाडताना दिसत आहे.अशा स्थितीत खालापुरातील 5,498 मतदार नेमके कुणाला निवडूण देणार याबाबत सर्वानाच उत्सुकता लागून राहिलेली आहे.खालापूरमध्ये खालापूर शहर,वनवेवाडी,शिरवली वाडी,महड,दांडवाडी आदींचा समावेश आहे.सर्वांनाच उत्सुकता 21 डिसेंबरला होणार्या मतदानाची आहे.
![](http://krushival.in/grygrars/2021/12/WhatsApp-Image-2021-12-19-at-5.33.24-PM.jpeg)
माणगावकरांचा कौल कुणाला?
मुंबई -गोवा महामार्गावरील महत्वाचे शहर म्हणून माणगावला ओळखले जाते.राजकीदृष्ट्या अतिशय जागरुक अशी या शहराची ओळख होत आहे.नगरपंचायतीच्या दुसर्या निवडणुकीच्या निमित्ताने सध्या येथील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघालेले आहे.सन 2017 मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस,शेकाप आघाडीने 17 पैकी 12 जागा जिंकत नगरपंचायतीवर सत्ता मिळविली होती.शहराचे प्रथम नगराध्यक्ष होण्याचा बहुमान राष्ट्रवादीच्या आनंद यादव यांना मिळाला.तर पुढील अडीच वर्षे योगिता चव्हाण या शहराच्या नगराध्यक्षा झाल्या.गेल्या पाच वर्षात सत्ताधारी राष्ट्रवादी,शेकाप आघाडीने विकासाच्या माध्यमातून शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला.मावळत्या नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचे 5 काँग्रेस 1 आणि शिवसेना पुरस्कृत 1 असे नगरसेवक होते.यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापने आघाडी करीत 13 उमेदवार उभे केलेले आहेत.त्यात राष्ट्रवादी 12 तर शेकाप 1 असे उमेदवार आहेत.शिवसेनेने काँग्रेस,भाजप समवेत युती करीत माणगाव विकास आघाडीच्या माध्यमातून 13 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविलेले आहेत.त्यात शिवसेना 9,काँग्रेस 2,भाजप 2 असे उमेदवार निवडणूक लढवित आहेत.माणगाव नगरपंचायतीमध्ये एकूण 17 प्रभाग आहेत.त्यातील 4 प्रभाग ओबीसीसाठी राखीव होते.त्यामुळे आता 21 डिसेंबरला 13 जागांसाठी मतदान होत आहे.तर उर्वरित चार प्रभागात 18 जानेवारीला खुल्या प्रवर्गातून मतदान होणार आहे.13 प्रभागात एकूण 10,751 मतदार आहेत.त्यात 5,581 पुरुष मतदार तर 5,164 महिला मतदार आहेत.राष्ट्रवादीकडून खा.सुनील तटकरे,पालकमंत्री अदिती तटकरे आदी निवडणुकीची धुरा सांभाळत आहेत.तर शिवसेनेकडून मंत्री सुभाष देसाई,राजीव साबळे हे प्रचारात सक्रिय झालेले आहेत.
पोलादपुरात राजकीय संगीतखुर्चीने विकासाला खीळ
मुंबई -गोवा महामार्गावरील महत्वाचे शहर म्हणून पोलादपूरला ओळखले जाते.तळ कोकणात असो वा घाटावर पोलादपूरला वळसा घालूनच जावे लागते.त्यामुळे या शहराला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे.सहा वर्षापूर्वी स्थापन झालेल्या पोलादपूर नगरपंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत येथील मतदारांनी शिवसेनेचे 13 नगरसेवक निवडूण देत सत्तेची चावी सुपूर्द केली.तर काँग्रेसला 4 जागांवर समाधान मानावे लागले.गेल्या सहा वर्षात पोलादपूरकरांनी पाच नगराध्यक्ष पाहिले.त्यात अश्विनी गांधी,सुनिता पार्टे, निलेश सुतार, नागेश पवार, राजा पवार यांचा समावेश आहे.नगराध्यक्षांच्या संगीतखुर्चीचा परिणाम मात्र शहराच्या विकासप्रक्रियेवर होत राहिला हे कुणीही नाकारु शकत नाही.पाच वर्षात अपेक्षित विकास करण्यात सत्ताधारी शिवसेना अपयशी ठरली हे नक्की.जी कामे यापूर्वीच पूर्ण झाली होती ती आपणच केल्याचा दावा सत्ताधारी करीत होते.तर न झालेल्या कामांचे श्रेयही हीच मंडळी घेताना दिसत होती.सध्या दुसर्या निवडणुकीत शिवसेनेचे 12,राष्ट्रवादी 4,काँग्रेस 9, मनसे 3,भाजप 9, अपक्ष 1 असे उमेदवार आपले राजकीय भवितव्य अजमावित आहेत.एकूण 17 पैकी 13 वॉर्डात 21 डिसेंबरला मतदान होणार आहे.त्यासाठी एकूण 3,691 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.सार्यांनाच विकासाची प्रतीक्षा आहे.त्यामुळे मतदार कुणाच्या बाजुने आपला कौल देतो हे निकालांती स्पष्ट होणार आहे.
![](http://krushival.in/grygrars/2021/12/WhatsApp-Image-2021-12-19-at-5.35.13-PM.jpeg)
पालीत बल्लाळेश्वराची कृपा कुणावर
अष्टविनायकाचे क्षेत्र म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या पाली नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीची रणधुमाळी आता ऐन रंगात आली आहे.मतदाररुपी बल्लाळेश्वर कुणाला पावणार याबाबत आता सार्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. एकूण 17 प्रभाग पैकी 13 प्रभाग ची निवडणूक होत असून, 4 ओबीसी प्रभागाची निवडणूक आता 18 जानेवारीला होणार आहे.पहिल्याच निवडणुकीत शेकाप आणि राष्ट्रवादी आघाडी करुन निवडणुकीस सामोरे गेलेल आहेत .शेकाप 6 तर राष्ट्रवादीचे 7 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना, भाजप व आरपीआय हे स्वतंत्रपणे निवडणुकीत उभे आहेत.सुधागड पालीत शेकाप राष्ट्रवादी आघाडीचे पारडे जड असून, आघाडीचे उमेदवार यांचे लोकाभिमुख चेहरे, उमेदवारांना जनमानसातून उदंड प्रतिसाद मिळत आहे.आघाडीच्या प्रचाराची धुरा शेकापतर्फे माजी आम.धैर्यशील पाटील,शेकाप नेते सुरेश खैरे हे सांभाळत आहेत तर राष्ट्रवादीतर्फे खा.सुनील तटकरे,पालकमंत्री अदिती तटकरे,आम.अनिकेत तटकरे हे थेट मतदारांशी संवाद साधून आघाडीला निवडूण देण्याचे आवाहन करीत आहेत.नगरपंचायतीमुळे पालीच्या विकासाला आता खर्या अर्थाने चालना मिळणार आहे.त्यामुळे मतदार कुणाच्या बाजुने झुकतो हे निकालांती स्पष्ट होणार आहे.या निवडणुकीत शिवसेना , भाजप चे नवखे चेहरे असल्याने त्यांचा निभाव कितपत लागतो हे समजून येणार आहे.पालीत 17 प्रभागात एकूण मतदार संख्या 8500 आहेत.
![](http://krushival.in/grygrars/2021/12/WhatsApp-Image-2021-12-19-at-6.49.57-PM-1024x551.jpeg)
म्हसळा नगरपंचायतीवर काँग्रेस-सेना युतीची सत्ता येणार-उद्योगमंत्री
म्हसळा नगरपंचायतीवर शिवसेना आणि काँग्रेस ची सत्ता आल्यानंतर म्हसळा नगर पंचायतीला कोणत्याही प्रकारची कमी पडणार नाही असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिले. शिवसेना आणि काँग्रेसच्या प्रचाराच्या वेळी ते बोलत होते. सर्वांनी एकजुटीने आमच्यावर विश्वास दाखवावा आणि म्हसळा वासीयांसाठी सेवा करण्याची संधी द्यावी.बाळासाहेबांचे आवडते मुख्यमंत्री म्हणून बॅरिस्टर ए. आर.अंतुले होते. पूर्वीच्या काळात वचन देऊन आम्ही काम करू असे आश्वासन दिले गेले असतील पण आमच्याकडून तसे केले जाणार नाही याची खात्री देतो. म्हसळा नगरपंचायत एकदा हाती दिली तर म्हसळया शहरातील सर्व सुविधा मार्गी लावण्याची मी हमी देत आहे असे देसाई यांनी सांगितले. .यावेळी माजी आमदार तुकाराम सुर्वे,माजी जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसाळकर,जिल्हा अध्यक्ष अनिल नवगणे,काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, काँग्रेस तालुका प्रमुख मोईझ शेख,शिवसेना तालुका प्रमुख सुरेश कुडेकर,माजी शिवसेना तालुका प्रमुख नंदू शिर्के,रवी लाड, महादेव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पालीत शेकाप,राष्ट्रवादीच्या प्रचाराला रंगत
प्रथमच होत असलेल्या पाली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 च्या प्रचार प्रसाराला रंगत चढली आहे. ही निवडणुक राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेची असल्याने सर्वच राजकीय पक्ष ताकतीने प्रचार प्रसार प्रक्रियेत सामील झालेत. शेकाप राष्ट्रवादी आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जातेय. राष्ट्रवादीच्या महिला रायगड जिल्हाध्यक्षा गीताताई पालरेचा या पाली नगरपंचायतीच्या प्रभाग क्र 10 मधून निवडणूक लढवत असून प्रचार व प्रसारादरम्यान गीताताई पालरेचा यांना जन मानसातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने त्यांचे पारडे जड असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पाली शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विकासदृष्टी असलेल्या गीताताई पालरेचा सत्तास्थानी असणे महत्त्वाचे असल्याचे जाणकार सांगत आहे.रविवारी गीता पालरेचा यांच्या प्रचारार्थ खा.सुनील तटकरे,ज्येष्ठ नेते वसंतराव ओसवाल,शेकाप नेते सुरेश खैरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचाररॅली काढण्यात आली.या रॅलीस सर्वस्तरातून उदंड प्रतिसाद लाभला.
- नगरपंचायतीच्या माध्यमातून येत्या काळात पालीचा चेहरा मोहरा बदलण्याचा आमचा निर्धार आहे.यासाठी शेकाप,राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी कटिबद्ध आहे.मुलभूत सुविधा पुरविण्यावर आमचा भर राहणार आहे. – गीता पालरेचा,राष्ट्रवादी उमेदवार
![](http://krushival.in/grygrars/2021/12/WhatsApp-Image-2021-12-19-at-5.35.48-PM-1024x471.jpeg)
तळेकरांना मुलभूत विकासाची प्रतीक्षा
तळा नगरपंचायतीमध्ये कौल कुणाला मिळणार याबाबत सर्वांना कमालीची उत्सुकता लागून राहिलेली आहे सहा वर्षापूर्वी निर्माण झालेल्या नगरपंचायतीमध्ये 11 उमेदवार शिवसेनेचे 6 उमेदवार राष्ट्रवादी चे निवडून आले होते.तळ्याच्या पहिल्या नगराध्यक्षा म्हणून शिवसेनेच्या रेश्मा मुंडे आणि उपनगराध्यक्षा म्हणून सायली खातू यांनी सहा वर्षे नगरीचा कारभार सांभाळला. नगरपालिकेच्या मागील कारकिर्दीमध्ये तळा शहराचा विकास होणे जरुरीचा होता तेवढा झालेली नाही अशी चर्चा आहे. परंतु शिवसेनेने 2 कोटी 53 लक्ष रुपयांची कामे तळा शहरात चालू केली आहेत त्यामध्ये रस्ते, गटारे कामे घेतली आहेत या कामाच्या जोरावर शिवसेना पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु तळा शहराच्या विकासाच्या दृष्टीने डम्पिंग ग्राउंड, गुरांचा कोंडवाडा, पाणी योजना, काही ठिकाणी पथदिवे शहरातील काही रस्ते तळा शहर सुशोभीकरण यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे.पण शहराचा कायापालट होताना दिसतोय हेही नसे थोडके.सध्या 17 पैकी 13 जागांसाठी निवडणूक होत आहे.त्यात शिवसेना 13,राष्ट्रवादी 11,शेकाप 2,भाजप 4, वंचित आघाडी 1 आणि अपक्ष 3 असे उमेदवार राजकीय भवितव्य अमजावित आहेत.त्यामुळे दि.21 डिसेंबरला होणार्या निवडणुकीत मतदार कुणाच्या बाजुने कौल देतो हे पाहणे इष्ट ठरेल.13 वॉर्डातील एकूण 4141 मतदार मतदानास पात्र आहेत.त्यात 2079 पुरुष तर 2062 महिला मतदार आहेत.