लोकप्रतिनिधींसह जागरुक नागरिकांचेही दुर्लक्ष
प्रवासी व विद्यार्थ्यांची होतेय प्रचंड गैरसोय
कापोली | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील बसस्थानक वार्यावर असल्याचे दिसून येते आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी बोर्लीपंचतन विभागातील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई करण्यात आली होती. तेव्हा बोर्लीपंचतन येथील एसटी स्टँडवरदेखील अतिक्रमणाची कारवाई झाली. त्यामुळे पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांना आसरा उरलेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करून दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरीही आमदार, खासदार किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी एसटी स्थानकासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. त्यामुळे परिसरातील संपूर्ण नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
श्रीवर्धन तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या बोर्लीपंचतन येथे
एसटी स्थानक नसल्यामुळे विद्यार्थी मासिक पास व एस टीचे आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. शेखाडीपासून ते दिघी परीसरातील अनेक लोकांना बोर्लीपंचतन हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे कायम गर्दी होत असते. खेडेगावातील प्रवाशांना मुंबई, पनवेल, विरार, नालासोपारा येथे जायचे असेल तर बोर्लीपंचतन शिवाय पर्याय नाही. रात्री-अपरात्री मुंबईहून आलेला चाकरमानी सकाळपर्यंत वाहन नसेल तर स्थानकात बिनधास्तपणे बसून राहत असत. मात्र, आता आसराच उरला नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून त्याचे गांभीर्य वाटत नाही; परंतु पावसाळा सुरू झाला की खरी अडचण काय आहे हे लक्षात येईल तोपर्यंत वाट पाहात न बसता लवकरात लवकर एसटी स्थानकासाठी कायमस्वरुपी जागा शोधून किंवा पूर्वी होते त्याच जागी स्थानकासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.