। मुरूड । वार्ताहर ।
गेल्या शुक्रवार पासून मुरूडचा प्रसिद्ध जंजिरा जलदुर्ग पर्यटकांना पाहण्यासाठी शासनाने खुला केल्याने मोठा अपेक्षित परिणाम दिसून आला असून शनिवारी मोठ्या संख्येने मुरूड बीचवर पर्यटकांनी हजेरी लावल्याचे दिसून येत आहे. फिरण्यासाठी मुरुडचा किनारा सर्वार्थाने सुरक्षित समजला जातो.
शनिवारी काशीद बीचवर पर्यटकांची फारशी वर्दळ नसल्याची माहिती काशीद येथील सूर्यकांत जंगम यांनी सायंकाळी दिली. त्या पार्श्वभूमीवर मुरूड बीचवर सायंकाळ पासून पर्यटकांची प्रचंड हजेरी दिसून आली. बनाना बोटिंग, आणि समुद्रातील विविध जलक्रीडांचा आनंद पर्यटक लुटताना दिसत होते. मुरूड बीचवरील वाळुवर मोफत पार्किंगची सुविधा असल्याने पर्यटक वाहने पार्क करून समुद्र किनार्यावर मनसोक्त फिरण्याचा आनंद लुटताना दिसून आले. मुरूड बीचवर 40 पेक्षा अधिक स्टॉल्स असून बीचवर खुल्या वातावरणात बसण्याची सुविधा असल्याने पर्यटक सुखावले आहेत. आगामी काळात मुरूडचे पर्यटन अधिक वाढणार याची ही नांदी ठरणार अशा प्रतिक्रिया मुरूड बीचवर पुणे येथून आलेल्या पर्यटकांनी व्यक्त केल्या. मुरूडचा किनारा सुरक्षित असल्याने पर्यटक समुद्रात पोहताना दिसत होते. समुद्राचे पाणी खारट असल्याने शरीरावरील त्वचा रोग, पुरळ नष्ट होत होत असतो.
मुरूडची ग्रामदेवता कोटेश्वरी देवी, 300 वर्षांपूर्वीचे श्री दत्तगुरूचे आध्यात्मिक देवस्थान, जंजिरा आणि पदमजलदुर्ग, ऐतिहासिक राजवाडा, 140 वर्षांपासूनचे गारंबी धरण, आंबोली धरण, खोकरी येथील पुरातन घुमट, अशी अनेक स्थळे पाहण्यासारखी आहेत. राज्यातील 94 पर्यटन स्थळे शासनाकडून विकसित करण्याचे निश्चित केले असून त्यामध्ये मुरूड तालुक्याचा देखील समावेश आहे. पर्यटन क्षेत्रात मुरूड तालुका अव्वालस्थानी असेल असा विश्वास खा. तटकरे यांनी व्यक्त केला आहे.