सामाजिक वनीकरणाविरोधात पर्यावरणप्रेमी संतप्त
। नेरळ । वार्ताहर ।
सामाजिक वनीकरण विभाग कर्जतच्या रोपवाटिकेमध्ये 42 जातींची 1 लाख 58 हजार रोपे तयार करण्यात आल्याचे सामाजिक वनीकरण विभागाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, ती झाडे नक्की लावली जात आहेत काय? असा सवाल पर्यावरणप्रेमी राजू पोतदार यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, प्रतिवर्षी वृक्षलागवड व त्यांच्या संगोपन तसेच संवर्धनासाठी शासन कोट्यवधी रूपये खर्च करीत असूनदेखील झाडे मात्र त्या प्रमाणात दिसत नसल्याने पोतदार यांचा दावा शासकीय यंत्रणा यांच्यासाठी आव्हानात्मक असाच आहे.
दरवर्षी रोपे लावण्यासाठी खड्डे खणणे, खत टाकणे, भराव करणे, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात बाजूचे गवत काढून बेणणी करणे, प्रत्येक रोपाला सुरक्षा आडोसा करावा लागतो. रोपाभोवती आळी तयार करून ऑक्टोबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यात पाणी घालावे लागते आणि त्यांच्या संरक्षण तसेच शासन खर्च करीत असते. त्याचवेळी देखभालीसाठी दोन कि.मी. किंवा हेक्टरी 500 रोपांकरिता एक मजूर यावर एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्षाकरिता हा निधी उपलब्ध केलेला असतो. मागील वर्षी कर्जत तालुक्यातील मुरबाड रस्त्यानजीकच्या एका गावातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नेलेली रोपे न लावताच फेकून दिलेली आढळली होती. खांडपे गावात ही परिस्थिती दिसून आली असली तर अलीकडे शिरसे येथील डोंगरावर वनविभाग गेली काही वर्षे दरवर्षी हजारो रोपांची लागवड केली होती.
दोन वर्षांपूर्वी डोंगरावर लागवड सुरू असताना तिथे उपस्थित असलेल्या वनाधिकार्यांनी शिरसे येथील डोंगरावर 65,000 रोपांची लागवड करण्यात आली आणि त्या रोपांच्या देखभालीसाठी मजूर नेमण्यात आले होते. मात्र, तरीदेखील शिरसे टेकडीवर किती झाडे सद्यःस्थितीत आहेत याचा शोध वन विभागाने घ्यावा, अशी मागणी राजू पोतदार यांनी केली आहे.
दुसरीकडे सामाजिक वनीकरणाच्या तसेच वनविभागाच्या माध्यमातून प्रतिवर्षी लावण्यात येणार्या झाडांच्या लागवडीपैकी 5 टक्के तरी रोपे जगतात का याकडेदेखील प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. गेल्या पाच वर्षात सामाजिक वनीकरण आणि वन विभाग यांच्या माध्यमातून जी झाडांची लागवड झाली त्याचे सर्वेक्षण शासनाने करावे, असे आवाहन पोतदार यांनी केले आहे.
मी स्वत: 5 जून 2022 पर्यावरणदिनी वृक्षलागवडीसाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या वरिष्ठांकडे 4 जून रोजी फोन करून 50 ते 60 रोपांची मागणी केली होती. परंतु, सामाजिक वनीकरणकडून अद्याप रोपे देण्यात आली नाहीत. त्यामुळे खासगी नर्सरीमधून मोजकीच रोपे खरेदी करून लागवड करावी लागली.
राजू पोतदार, पर्यावरणप्रेमी