। मुंबई । प्रतिनिधी ।
घरोघरी तिरंगा या अभियानात प्रत्येक नागरिक सहभागी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वज विकत घेऊन हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मंत्रालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. या अभियानात महाराष्ट्र अग्रस्थानी राहिल. यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगत होऊन प्रत्येक नागरिक या अभियानाशी जोडला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेद अभियानांतर्गत महिला बचतगटाच्या विक्री दालनातून राष्ट्रध्वज विकत घेतले.
यावेळी मंत्रालयातील काही अधिकार्यांनी महिला बचतगटाच्या विक्री दालनातून विकत घेतलेले राष्ट्रध्वज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले. तसेच यावेळी महिला बचतगटाच्या महिलांनी स्वत: तयार केलेले राष्ट्रध्वज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेट दिले.
या कार्यक्रमास मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, घरोघरी तिरंगा अभियानाचे नोडल अधिकारी अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्षाबंधन असल्याने महिला बचत गटाच्या महिलांनी आणि सलाम बॉम्बे या संस्थेच्या विद्यार्थिनींने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना राखी बांधून हा सण साजरा केला.
सेल्फीसाठी गर्दी
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात घरोघरी तिरंगा अभियानानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत राष्ट्रध्वजासह सेल्फी काढून घेण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. मंत्रालयातील अधिकारी तसेच समस्त कर्मचार्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना अक्षरशः जणू घेरावच टाकला होता.