। मुंबई । प्रतिनिधी ।
शेतकर्यांचे विविध प्रश्न आणि मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे. शेतकर्यांच्या प्रश्नावर मुंबईतील समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा तुपकर यांनी दिला होता. बुधवारी तुपकर मुंबईत पोहचण्याआधीच सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदतीची घोषणा करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करुन प्रश्न मार्गी लावू, असे आवाहन केले. यानंतर तुपकर यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.
स्वाभिमान संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कापूस व सोयाबीन विषयी जलसमाधी आंदोलन पुकारले होते. मात्र, चर्चेतून प्रश्न मार्गी लावू, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तुपकर यांना आवाहन केले होते.
यानंतर पनवेल या ठिकाणी आंदोलन थांबवून तुपकर यांचे शिष्टमंडळ चर्चेसाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले. तुपकर यांच्या आंदोलनाच्या इशार्यानंतर बुधवारी शिंदे-फडणवीस सरकारने तातडीने याकडे लक्ष देत महत्वाच्या घोषणा केल्या. बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्याला 157 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांसाठी ही मदत जाहीर केली गेली.