हिंदू जनजागृती समितीचा सवाल; चौकशी आयोगाच्या अहवालातही अनेक उणिवा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पूल वाहून गेलेल्या घटनेला 2 ऑगस्ट रोजी पाच वर्षे पूर्ण झाली. हा इतिहासकालीन पूल कमकुवत असून, वाहतुकीस बंद करावा, अशा सुचना असतानाही अतिवृष्टीमध्ये वाहतूक सुरुच ठेवण्यात आली होती. या दुर्घटनेस जबाबदार कोण? याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या एस.के. शहा आयोगानेही गंभीर चुका करणार्या सर्वच अधिकार्यांना पाठीशी घातले आहे. शासकीय यंत्रणा चुका करणार आणि त्याचा परिणाम कितीकाळ सामान्य नागरिकांनी भोगायचा, असा सवाल करीत हिंदू जनजागृती समितीने उपस्थित केला आहे.
सावित्री नदी दुर्घटनेला पाच वर्षे पूर्ण होऊनही दोषींवर कारवाई झाली नाही, या विषयाला वाचा फोडण्यासाठी अलिबाग येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हिंदू जनजागृतीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी त ते बोलत होते. या वेळी आयोगाच्या या अहवालाची तज्ञांकडून पुनर्पडताळणी करण्यात यावी आणि या दुर्घटनेसाठी उत्तरदायी असणार्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही डॉ. धुरी यांनी यावेळी केली.
दुर्घटना घडल्यानंतर चौकशी आयोग नेमून चौकशा केल्या जातात, यासाठी लाखो रुपये खर्च करुनही काहीही निष्पन्न होत नसल्याचे हिंदू जनजागृतीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांचे म्हणणे आहे. 2 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीत रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल वाहून गेला होता. त्यात 2 बस आणि 1 चारचाकी गाडी वाहून गेल्याने तब्बल 40 हून अधिक जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. या प्रकरणी प्रशासनाच्या गंभीर चुका ढळढळीत दिसत असतानाही चौकशी आयोगाने सर्वांना ङ्गक्लीन चीटफ दिली. हा दोषींना पाठीशी घालण्याचा प्रकार असून, हा अहवाल संसार उद्ध्वस्त झालेल्या दुर्घटनाग्रस्तांवर अन्याय करणारा आहे. एका संवेदनशील घटनेची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेला आयोगच जर दोषींना पाठीशी घालून असंवेदनशीलता दाखवत असेल, तर मग सावित्री नदीत वाहून गेलेल्या 40 पेक्षा अधिक जणांच्या मृत्यूला उत्तरदायी कोण ? असा सडेतोड प्रश्न हिंदू जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी केला आहे. याचमुळे सरकारी यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे गंभीर दुर्घटना घडत आहेत. रायगड जिल्ह्यातील नागोठणे, रोहा, रेवदंडा, खारपाडा आदी धोकादायक पुलांवर कोणतेही सुचना फलक लावलेले नाहीत. त्याचबरोबर येथे दिवे नसल्याने पुढे कोणता धोका निर्माण झालेला आहे याची कल्पना पुलावरुन प्रवास करणार्यांना अजिबात येत नाही.