पाच गावे, सात वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील पाणीटंचाई, दरडप्रवणता आणि रस्ते दळणवळणाची दुर्गमता यामुळे बहुतांशी लोकसंख्या स्थलांतरीत झाल्याने टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठ्याच्या टँकरची क्षमता आता खूपच कमी करण्यात आली आहे. पोलादपूर रानबाजिरे एमआयडीसीच्या धरणातील पाणी टँकरद्वारे पुरवठ्यासाठी उपलब्ध होण्यास मनमानीपणाचा अडथळा असल्याने यंदा लोहारे येथील बागडे फार्महाऊस येथे पाण्याचे खासगी अधिग्रहण करण्यात येऊन टँकर भरून पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पोलादपूर पंचायत समितीचे अभियंता कांबळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस दिली.
पोलादपूर तालुक्यातील बाळमाची, आंबेमाची, कुडपण खुर्द, नाणेघोळ, बोरावळे आदी महसुली गावे आणि कामथे फौजदारवाडी, महालगूर मोरेवाडी, कातळी कामतवाडी, क्षेत्रपाळ धनगरवाडी आणि क्षेत्रपाळ कामतवाडी या गावांतून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव आले असून, 16 एप्रिल पासून चांभारगणी बुद्रुक आणि किनेश्वर या गावांना तसेच कालवली गावातील पाटीलवाडी, पवारवाडी, भोसलेवाडी, विठ्ठलवाडी आणि किनेश्वर पेढावाडी आणि तुटवली गललीची वाडी याठिकाणी पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पोलादपूर तालुक्यातील सर्वच नद्या कोरड्या पडल्या असून, सार्वजनिक विहिरींनादेखील पुरेसे पाणी नसल्याने गावातील अखंड हरिनाम सप्ताह संपल्यानंतर चाकरमानी मंडळींनी घरातील वयोवृद्धांना आपल्यासोबत शहरात वास्तव्यास नेले आहे. गावाकडे पावसाळ्यात पूरस्थिती तसेच दरडप्रवण परिस्थिती उद्भवत असल्याने जीवितहानी टाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याने गावाची लोकसंख्या टंचाईकाळात फारच कमी होऊन शहराकडे स्थलांतरीत होत आहे. यामुळे टंचाईग्रस्त गावांतील पाण्याची मागणी पूर्वीप्रमाणे फार मोठी नसल्याने केवळ पाच हजार लीटर्स पाण्याची क्षमता असलेल्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.