पालकमंत्र्यांची ग्वाही,ध्वजारोहण उत्साहात
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
स्वच्छता व आरोग्य दोन्हींचा समतोल राखून स्वत:च्या जिल्ह्याचा, राज्याचा व आपल्या देशाचा विकास राखण्यात आपण सर्वजण पुढाकार घेवू या, असे प्रतिपादन पालकमंत्री रायगड अदिती तटकरे यांनी रविवारी अलिबाग येथे केले.
पोलीस कवायत मैदान येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 74 वा वर्धापनदिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी जि.प.अध्यक्षा योगिता पारधी, सभापती,बबन मनवे, गीता जाधव, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे आदींसह सर्व अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर तंबाखू मुक्तीबाबत उपस्थित सर्वांनी शपथ घेतली. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या, त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टीमुळे आलेला महापूर,दरड दुर्घटना व करोना या संकटात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.