शिक्षक परीषदेच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

शिक्षकांच्या प्रलंबित प्रमुख मागण्यांवर चर्चा
| अलिबाग । वार्ताहर ।

महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने शनिवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या आणि भेडसावणार्‍या समस्यांबाबत राज्यपालांना माहिती देवून त्यावर चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व शिक्षक परीषदेचे संस्थापक अध्यक्ष आ. संजय केळकर यांनी केले. 1 नेव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करून ज्या डीसीपीएस धारक शिक्षक बांधवांचा मृत्यू झालेला आहे. त्यांच्या कायदेशीर वारसास अनुकंपा तत्त्वाचा लाभ मिळावा, ज्या डीसीपीएस धारक शिक्षकांचा मृत्यू झाला आहे अशांना सेवेची कोणतीही अट न ठेवता सरसकट 10 लाख रूपये अनुदान प्राप्त झाले पाहिजे. एमएससीआयटीला 2022 पर्यंत मुदतवाढ द्यावी व ज्यांची वसुली करण्यात आलेली आहे त्यांची रक्कम त्यांना अदा करावी अशी मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली.

शिक्षक मतदार संघात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी महाराष्ट्र लोकप्रतिधीत्व कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्राथमिक शिक्षकांना आश्‍वासित प्रगती प्रगती योजना लागू करणे, शाळांना विद्युत देयके अनुदान प्राप्त होणे, शिक्षकांना कॅशलेस वैद्यकीय प्रतिपूर्ती सुविधा प्राप्त होणे, आंतरजिल्हा बदलीसाठी पती-पत्नी विनाअट एकत्रीकरण करणे बाबत या प्रमुख मागण्यांचा समावेश होता. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संचलित गत दोन वर्षांपासून संचालित त्रैमासिक शिक्षकमित्रच्या अंकाचे प्रकाशनही राज्यपाल यांच्या हस्ते झाले. शिक्षक परीषदेने कोविड काळात केलेल्या कामाची माहिती यावेळी राज्यपालांना देण्यात आली. यावेळी राजेश सुर्वे, डॉ. सतपाल सोवळे, रावसाहेब रोहकले, पुरुषोत्तम काळे,मधुकर उन्हाळे, प्रकाश चतरकर, बाबुराव गाडेकर, भरत मडके, राजेन्द्र नांद्रे,बालाजी गुबनारे, नितिन चव्हाण यांचा समावेश होता.

Exit mobile version