। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वेळास हद्दीत गुरुवारी (दि. 23) रात्री झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले. वेळास येथील रहिवासी रश्मी रत्नाकर तोडणकर यांच्या वाड्याचे छत पूर्णपणे कोसळल्याने घरगुती स्तरावर सुरू असलेल्या काजू प्रक्रिया उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे.
तोडणकर कुटुंबीयांकडून या वाड्यात काजू प्रक्रिया उद्योग चालविला जात होता. मात्र, रात्री झालेल्या संततधार पावसामुळे वाड्याचे छत अचानक कोसळले. या दुर्घटनेत आतील काजू प्रक्रिया उद्योगातील यंत्रसामग्री, मशिन्स तसेच इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे कुटुंबाचा व्यवसाय ठप्प झाला असून, त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. प्रशासनाने नुकसानीची तातडीने दखल घेऊन तोडणकर कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.







