। महाड । चंद्रकांत कोकणे ।
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती 14 एप्रिल रोजी संपूर्ण भारत देशामध्ये साजरी करण्यात येत आहे. अखंड मानवजातीसाठी त्यांनी जे कार्य केलेले आहे त्याला इतिहासामध्ये तोड नाही. भारतीय विज्ञान शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ व समाज सुधारक म्हणून त्यांनी केलेल्या कार्याबरोबर बौद्ध चळवळीला त्यांनी प्रेरणा दिली आहे आणि समाजामध्ये होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारणे, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या न्याय हक्काचे समर्थन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभर साजरी केली जात असताना या दिवसाला समानता दिवस आणि ज्ञानदीप दिवस म्हणूनही साजरा करण्यात येतो. कारण आयुष्यभर समानतेसाठी लढा देणारे डॉ.आंबेडकर यांना समानता तसेच न्यायाचे प्रतीक मानले जाते.डॉ. आंबेडकर यांचा वाढदिवस त्यांचे जवळचे अनुयायी सदाशिव रणपिसे यांनी 14 एप्रिल 1928 मध्ये पुण्यामध्ये प्रथम साजरा केला होता. अशा या थोर पुरुषाचा जन्म मध्यप्रदेशातील इंदुर जवळ असलेल्या महू या गावामध्ये 14 एप्रिल 1891 रोजी झाला, यानंतर बाबासाहेबांचे वडील रामजी सुभेदार हे मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईमध्ये आले. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात असलेल्या आंबडवे हे त्यांचे मुळगाव, यागावात सकपाळ नावाची बहुतांशी कुटुंबे राहत होती बाबासाहेबांचे नाव देखील सकपाळ होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. 20 मार्च 1927 या दिवशी रायगड जिल्ह्यातील महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झाला. हा दिवस समता दिन तसेच सामाजिक सबलीकरण दिन म्हणून देखील साजरा केला जातो. माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी पीडितांच्या हक्कांसाठी बाबासाहेबांनी आजन्म लढा दिला. त्यातीलच एक महत्त्वाचा लढा म्हणजे चवदार तळ्याचा सत्याग्रह.
त्याकाळी असलेल्या अमानवीय जातीव्यवस्थेमुळे जनावरांपेक्षा देखील हालाखीचे जीवन अस्पृश्यांना जगावे लागत होते. त्यांचा दोष इतकाच की त्यांचा जन्म एका विशिष्ट जातीमध्ये झाला होता. वर्षानुवर्षे अन्याय सहन करत आलेल्या आपल्या समाजाला या अन्यायातून मुक्त करणे हे त्यावेळी मोठे आव्हान होते.
उच्चवर्णीयांकडून वेळोवेळी मिळणारी अपमानास्पद वागणूक, गुलामगिरी एवढेच काय तर निसर्गाची देणगी म्हणजे पाणी ते देखील त्यावेळी अस्पृश्यांना पिण्याचा किंवा सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा साधा अधिकार नव्हता. भारतीय जातीव्यवस्थेमुळे अस्पृश्यांना उच्च जातीय हिंदूपासून वेगळे ठेवण्यात आले होते. अस्पृश्यांना पाण्याच्या मुख्य स्त्रोतामधून पाणी घेण्यास तसेच मुख्य रस्त्यावरून चालण्यास देखील परवानगी नव्हती. ऑगस्ट 1923 मध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय पारित केला. त्यामध्ये सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुस्थितीत ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांनाही हक्क असेल. महाडच्या नगरपालिकेनेही जानेवारी 1924 रोजी या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला. परंतु या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही. सत्याग्रहासाठी रायगड जिल्ह्यातील महाड हे शहर निवडण्यात आले कारण उच्च जातीय हिंदूंनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी दाखवली होती. त्यामध्ये गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, अनंत विनायक चित्रे, सुरेंद्रनाथ टिपणीस हे महाड नगरपालिकेचे प्रमुख देखील यामध्ये सहभागी होते. यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी महाड सत्याग्रहाच्या दरम्यान बाबासाहेबांना मदत करत होते.
1927 साली सुरेंद्रनाथ टिपणीसांना नगरपालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती, सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले. सभेनंतर सर्वजण चवदार तळ्याकडे गेले. आंबेडकर सर्वात प्रथम त्या तळ्यामधून पाणी प्यायले आणि त्यानंतर तिथे जमलेले सर्व लोक त्या तळ्यातील पाणी प्यायले. त्यावेळी सुमारे 3 हजारांहून अधिक लोक या सभेसाठी आणि नंतर चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी आलेले होते.
चवदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना उद्देशून म्हटले होते. चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आजपावेतो चवदार तळ्याचे पाणी नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरीता नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरीताच त्या तळ्यावर आपल्याला जावयाचे आहे. हा सत्याग्रह म्हणजे भारताच्या इतिहासातील एक अनन्यसाधारण घटना नोंद करण्यात आली आहे.
राज्य शासनाने महाडच्या चवदार तळ्याचे सौंदर्यीकरण करण्यात आल्यानंतर हे तळे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले तसेच सामाजिक न्याय विभाग येथे भव्य असे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आले आहे.नगरपालिकेच्या माध्यमातून चवदार तळ्याचे स्वच्छता तसेच साफसफाई योग्य प्रकारे केली जाते. दरवर्षी महाडमध्ये चवदार तळे सत्याग्रह आता वर्धापन दिन भव्य स्वरूपात साजरा केला जातो. आज चवदार तळ्यामुळे महाड शहराला महत्व प्राप्त झाले आहे







