| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
लडाखमध्ये लष्कराच्या सरावादरम्यान रणगाडा नदीत कोसळल्याने पाच जवान शहीद झाले आहेत. नदी ओलांडताना पाणी अचानक वाढल्याने मोठी दुर्घटना आज घडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहिदांमध्ये एक जेसीओचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लडाखमधील दौलत बेग ओल्डी भागात रणगाड्यांचा सराव सुरू होता. याठिकाणी लष्कराचे अनेक रणगाडे उपस्थित होते. यावेळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) टी-72 टँकने नदी कशी ओलांडायची याचा सराव सुरू होता. नदी ओलांडत असताना नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे लष्कराचे जवान अडकले. यात जेसीओसह भारतीय लष्कराचे चार जवान शहीद झाले आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
या घटनेवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे की, लष्कराच्या पाच जवानांच्या मृत्यूबद्दल त्यांना खूप दुःख झाले आहे. आम्ही आमच्या शूर सैनिकांची देशासाठी केलेली अनुकरणीय सेवा कधीही विसरणार नाही. शोकाकुल कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. या दु:खाच्या काळात देश त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.