| पनवेल | वार्ताहर |
सानपाडा परिसरातील नागरिकांना एका ठिकाणी दैनंदिन फळे,फुले,भाज्या खरेदी साठी बाजार संकुलाची निर्मिती करण्यात आली. या घटनेला चार वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला. परंतु आजपर्यंत या बाजार संकुलाच्या उद्घाटनाला मुहूर्त सापडला नाही. यामुळे येथील व्यवसायिक नाराजी व्यक्त करत असून काही व्यवसायिक भर पावसात उघड्यावर आपला व्यवसाय करत आहेत. त्यामुळे या बाजार संकुलाचे लवकरात लवकर लोकार्पण करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांनी आयुक्तांकडे वारंवार निवेदनाद्वारे केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिक कडून सानपाडा विभागात सेक्टर 4,भूखंड क्रमांक 17 नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी एक बंदिस्त व प्रशस्थ दैनंदिन बाजार संकुल उभारण्यात आले. दैनंदीन बाजार संकुलासाठी महानगरपालिकच्या तिजोरीतून लाखो रूपये खर्च करण्यात आले. या बाजाराचे बांधकाम 2020 मध्ये पूर्णत्वास गेले. नागरीकांच्या सोयी सुविधासाठी बाजार संकुल बांधण्यात आले पण राजकीय श्रेयवादासाठी सदर संकुलाचे लोकार्पण झाले नसल्याचे स्पष्ट आरोप आयुक्तांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट म्हटलें आहे. बाजार संकुलाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन 4 वर्ष आहे.परंतु इमारत बंद असल्यामुळे भाजी, फळ, फुले विक्रेते यांना रस्त्यांवर अतिक्रमणं करून बाजार व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहे. ऊन- वारा – पाऊस यांचा सामना करत सामान्य नागरिकांना उघड्यावरच दैनंदीन वस्तूंची खरेदी करावी लागत आहे. सध्या मुसळधार पावसात गुडघाभर पाण्यात सदर व्यवसायिक व्यवसाय करीत आहेत तर सामान्य जनता अश्या दयनीय परिस्थिती मध्ये फळे,भाजी ,फुले खरेदी करताना नाराजगी व्यक्त करीत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
या विविध समस्येबद्दल महानगरपालिका आयुक्तांना वेळी-वेळी केली आहे परंतु अजून पर्यंत उद्घटनास प्रशासन सकारात्मक दिसून येत नाहीत.यामुळे मागील गेल्या 4 वर्षापासून इमारत बंद अवस्थेत असल्यामुळे इमारतीचे नुकसान होत आहे.यामुळे उद्घाटन जेव्हा करण्याची वेळ येईल. त्यावेळी पुन्हा आवश्यक असणारा देखभाल अथवा डागडुजीचे अतिरिक्त खर्च पालिकेला करावा लागेल.हा पैसा सामान्य जनतेच्या तिजोरीतून केला जाणार असल्यामुळे करदात्या सामान्य नागरिकांचेच नुकसान होणार आहे. दुसरीकडे दैनंदिन बाजार संकुल चालु झाले तर व्यवसायिकांमार्फत महानगरपालिकच्या तिजोरीत कररूपी लाखो रुपये जमा होवू शकतात. परंतु बाजार संकुलाचे उद्घाटन होत नसल्याने महानगरपालिकचेच आर्थिक नुकसान होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महानगरपालिकाकडून सानपाडा येथे बाजार संकुल उभारले आहे.त्यामध्ये व्यवसाय करण्यासाठी 80 ओटले आहेत.हे संकुल निर्मितीसाठी एक कोटीच्या आसपास खर्च आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बाजार संकुलाचे लोकार्पण व्हावे.म्हणून मी प्रशासक या नात्याने आयुक्तांना दैनंदिन बाजार संकुल लवकरात लवकर सामान्य नागरीकांच्या सोयी करता खुले करण्यात यावे.म्हणून आयुक्तांना निवेदन दिले आहे.जर संकुलाचे लोकार्पण केले नाहीतर नागरिकांच्या तीव्र आंदोलनास सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा देखील दिला आहे.
निलेश कचरे (सामाजिक कार्यकर्ता, नवी मुंबई)