कुंडलिकाने ओलांडली इशारा पातळी
| अलिबाग । विशेष प्रतिनिधी |
परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसात मोठया प्रमाणात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सहाही नद्यांची पाण्याची पातळी वाढली होती. सकाळी 11 च्या दरम्यान कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन तीने इशारा पातळी ओलांडली होती. मात्र त्यानंतर पातळीत जास्त वाढ न झाल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. तरी देखील प्रशासनाने जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पाटबंधारे खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाड तालुक्यातील सावित्री नदीची धोका पातळी 6.50 मी. असून सध्या पाण्याची पातळी 4.40 मीटर इतकी असून इशारा पातळी पेक्षा कमी आहे. नागोठणे येथील अंबा नदीची धोका पातळी 9 मी. असून सध्या या नदीने 7.40 मी इतकी पातळी गाठली असली तरी इशारा पातळी पेक्षा कमी असल्याने धोका नाही. रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीची 23.95 मी इतकी धोका पातळी असून सदर नदीने इशारा पातळी ओलांडत 23.40 मी इतकी पातळी गाठली होती. त्यामुळे किनार्यावरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदीची 21.52 मी. इतकी धोक्याची पातळी असून सध्या नदीने 19.30 मीटर इतकी पातळी गाठली आहे. तर कर्जत तालुक्यातील उल्हास नदी देखील भरभरुन वाहत असून 48.77 इतकी धोक्याची पातळी असलेल्या उल्हास नदीने सध्या 45.10 मी पातळी गाठली असली तरी इशारा पातळी पेक्षा कमी असल्याने धोका नाही. तसेच पनवेल तालुक्यील गाढी नदी 6.55 धोकादायक पातळीपेक्षा 2.50 मीटर इतक्या पातळीवर वाहत असल्याने धोका नसल्याचे प्रशासनाने सांगितले.
गेल्या 24 तासात 59.16 टक्के पर्ज्यनमानाची नोंद झाली असून 946.60 मी मी इतका पाऊस पडला. सर्वाधिक पावसाची नोंद माथेरामध्ये 123 मीमी इतकी झाली आहे. पनवेल आणि उरण तालुक्यामध्ये देखील 94.60 आणि 97 इतकी नोंद झाली असून मुरुडमध्ये सर्वात कमी 24 इतकी नोंद झाली आहे.