कोंढेपंचतन रस्त्याच्या कामावर ग्रामस्थांचे गंभीर आरोप; हाताने उखडणारे डांबर पाहून संताप
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील कोंढेपंचतन येथे सुमारे 4 कोटी 60 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या रस्त्याच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नव्याने तयार झालेला रस्ता काही दिवसांतच उखडू लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, कामाच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन रस्त्याची पाहणी केली असता डांबराचा थर सहजपणे निघत असल्याचा दावा केला आहे. काही नागरिकांनी यासंदर्भातील व्हिडिओदेखील तयार केले असून, त्यामध्ये रस्त्यावरील डांबर हाताने उचलले जात असल्याचे दिसून येत आहे. डांबराखाली अपेक्षित प्रमाणात खडी किंवा मजबूत बेस लेयर नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या बांधकामात आवश्यक तांत्रिक निकषांचे पालन करण्यात आले नसावे. धूळ व माती योग्य पद्धतीने साफ न करता थेट डांबर टाकल्यामुळे डांबराचा थर जमिनीशी घट्ट न चिकटता अल्पावधीत उखडू लागल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे 4.60 कोटी रुपयांच्या निधीचा वापर नेमका कसा झाला, कामाची गुणवत्ता तपासणी कोणी केली, तसेच संबंधित यंत्रणांनी देखरेख योग्यरित्या केली का, असे प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत.
रस्त्याच्या कथित निकृष्ट कामामुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कामात दोषी आढळणाऱ्या ठेकेदार, अभियंते आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी केलेल्या आरोपांबाबत संबंधित विभाग अथवा ठेकेदारांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यामुळे या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
