श्रीवर्धन येथील भूमिलेख कार्यालयाचा प्रताप

जमिनीच्या मोजणीसाठी लावले 20 महिने
| दिघी | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाचा प्रताप समोर आला आहे. येथील शेतकऱ्याने तातडीच्या मोजणीची फि भरुन देखील त्याच्या जमिन मोजणीसाठी तब्बल 20 महिन्यांचा कालावधी लावला आहे. यातील गंभीर बाब म्हणजे चौथ्यांदा तारीख देऊनही येथील अधिकारी आणि कर्मचारी मोजणीसाठी आलेच नसल्याने या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

याबद्दल पीडित शेतकऱ्याकडून मिळालेली माहिती अशी कि, मूळ आसुफ येथील शेतकरी रियाज मोमीन हे कामानिमित्त पुणे येथे राहतात. मोमीन यांनी अतितातडीच्या जागा मोजणीसाठी डिसेंबर 2021 मध्ये अर्ज केला होता. त्यानंतर त्याची शासकीय फी देखील भरली गेली मात्र, त्यानंतर सर्व्हेयर आला पण जागा साफ नसल्याचे जुजबी कारण देत मोजणी न करताच निघून गेला.

त्यानंतर भूमिअभिलेखकडून शेतकऱ्यांना पुन्हा अतीतातडीची मोजणी फी भरायला सांगण्यात आली, ती देखील भरली. मात्र, त्यानंतर हि दोनदा श्रीवर्धन भूमिअभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी मोजणी केली नाही. एका अतितातडीच्या मोजणीसाठी दोन्ही मोजणी शुल्क भरूनही तब्बल वीस महिने ताटकळत ठेवण्यात आल्याने शेतकऱ्याच्या संयमाचा बांध तुटला आहे.

जागामालक मोनिन यांनी भूमिअभिलेख कार्यालयात चौकशी केली असता, कर्मचारी नसल्याचे सांगण्यात आले. भूमी अभिलेख विभागाच्या अशा वागण्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत. मात्र याबाबत संबंधीत विभागाला काहीच देणे-घेणे नसल्याचे चित्र आहे. अशा कारभारामुळे तालुक्यातील जनता त्रस्त झाली आहे. याकडे कुणी वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी लक्ष देतील का असा संतप्त सवाल आता जनता विचारत आहे.

बुधवारी 18 ऑक्टोबर रोजी मोजणी करण्याची चौथ्यांदा तारीख दिली होती मात्र संबंधीत कर्मचारी संध्याकाळ झाली, तरी आले नव्हते. तेव्हा कर्मचारी निवडणूक कामात असल्याचे सांगण्यात आल्याचे, मोमीन यांनी सांगितले. फि भरुन सुध्दा प्रशासन लक्ष देणार नसेल तर हे फारच गंभीर आहे, असेही ते म्हणाले. कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यातच आता निवडणुक कामाची जबाबदारी असल्याने अनेक जागा मोजणीचे प्रकरण प्रलंबित आहेत.

हिरालाल मोरे, भूमिअभिलेख अधिकारी
Exit mobile version