। मुंबई । प्रतिनिधी ।
इंडियन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील साखळी फेरीतील सर्व 70 सामने खेळून झाले आहेत. त्यामुळे अंतिम 4 संघही निश्चित झाले आहेत, तर सहा संघांचे आव्हान संपले आहे. या सहा संघांमध्ये पाचवेळचे आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्स संघाचाही समावेश आहे. मुंबई इंडियन्ससाठी यंदाचा हंगाम अत्यंत निराशाजनक राहिला. मुंबईला आयपीएलच्या 17 व्या हंगामात 14 सामन्यांपैकी केवळ 4 सामने जिंकता आले. त्यांनी 10 सामन्यांमध्ये पराभव स्विकारला. त्यामुळे त्यांना केवळ 8 पाँइंट्सच मिळवता आले. त्यामुळेच मुंबई पाँइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर राहिले.
दरम्यान, मुंबई इंडियन्सने शेवटचा सामना खेळल्यानंतर ड्रेसिंग रुममधील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्सची संघमालकीण नीता अंबानी यांनी खेळाडूंशी संवाद साधलेला दिसत आहे. त्यांनी म्हटले की, हा आपल्या सर्वांसाठीच निराशाजनक हंगाम होता. आपल्याला जशा गोष्टी हव्या होत्या, तशा त्या झाल्या नाहीत. पण मी फक्त एक मालकीण नाही, तर मुंबई इंडियन्सची नेहमीच एक मोठी चाहती राहिली आहे. मला वाटते मुंबई इंडियन्सची जर्सी परिधान करणे एक सन्मान आहे. मुंबई इंडियन्सशी जोडले जाणे माझ्यासाठी एक सन्मान आणि आणि आनंदाची गोष्ट आहे. मला वाटते की, आता आपण परत जाऊ आणि कामगिरीची समीक्षा करू, यावर विचार करू. याशिवाय नीता अंबानी यांनी आगामी टी-20 विश्वचषकासाठी निवड झालेल्या आपल्या संघातील खेळाडूंनाही शुभेच्छा दिल्या.