अनिष्ट प्रथा बंदी आणि जुन्या रीतिरीवाजांमधे सकारात्मक बदल.
| बोर्लीपंचतन | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी ते दिघीपर्यंतच्या 11गावातील भंडारी समाजाने प्रबोधनासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. समाजाली अनिष्ठ प्रथा आणि जुन्या रीतिरिवाजांना फाटा देत त्यात आता सकारात्मक बदल घडविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
याबाबत अकरा गावातील समाज अध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक दिवेआगर येथील भंडारी समाज सभागृहात विभागीय संघटना पंचतन विभाग अध्यक्ष अरुण मांजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत समाजामधे पूर्वापार चालत आलेल्या काही जून्या सामाजिक प्रथांमधे बदल करुन समाजाचा वेळ आणि काही प्रथांमुळे विनाकारण होणारा आर्थिक भार कमी करुन त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.सदर सभेमध्ये समजोन्नतीसाठी पुढील विषयांवर सविस्तर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली.
दिवसकार्यात खर्चिक बाबींना बंदी
पंचतन विभागात मृत व्यक्तिच्या तिसर्या दिवसाच्या विधीसाठी सकाळी 8 व दशक्रिया विधीसाठी सकाळी 9 या वेळेचं नियोजन करण्यात आलं.बाराव्या विधीकार्याच्या दिवशी कपड्यांचे आहेर देण्याची प्रथा बंद करून दुःखी कुटूंबाला आर्थिक स्वरूपात मदत करणे,मयत व्यक्तींना खांदा देणार्या खांदेकरी व्यतिरीक्त इतरांना भांडी वाटण्याची खर्चिक प्रथा बंद करणे, अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी दुःखी कुटूंबाच्या घरी शिजवलेले अन्न घेऊन न जाता जीवनावश्यक वस्तू नेणे आदी निर्णय घेण्यात आले.
चौकट
विवाहात नवीन पायंडे नकोत
साखरपुडा किंवा टिकली लावणे हा एकच कार्यक्रम ठेवणे,साखरपुडा कार्यक्रमात वराकडून वधुला अंगठी घालण्याची प्रथा आहे.मात्र हल्ली वधुकडूनही वराला अंगठी घातली जाते हा नविन पायंडा पडू नये यासाठी मुलीने मुलाला अंगठी घालू नये,विवाह विधी झाल्यावर वधू वराने प्रथम आहेर स्वीकारुन ब्राह्मण विधी नंतर करुन उपस्थितांच्या वेळेची बचत करावी, विवाहप्रसंगी वधू वर यांना उचलून हार घालणे, साखरपुड्यामध्ये केक कापणे ही नव्याने सूरु झालेली प्रथा बंद करणे,विवाह प्रसंगी भांडी व कपड्यांचे आहेर बंद करून यजमानांना आर्थिक स्वरूपात मदत करणे,हळदीच्या समारंभाला साड्यांचे आहेर न देणे
अनिष्ट विधवा प्रथांवर बंदी
पतीच्या मृत्युनंतर पत्नीचं कुंकू पुसणे,मंगळसूत्र काढणे,हातातल्या बांगड्या फोडणे, पायातली जोडवी काढणे अर्थात सर्व शृंगार उतरवणे अशा समाजात प्रचिलीत असलेल्या अनिष्ट विधवा प्रथा बंदीबाबत महत्वपुर्ण आणि तेवढाच धाडसी निर्णय घेण्यात आला.
सदर बैठकीला 11गावचे भंडारी समाजअध्यक्ष,समाजाचे विविध पदधिकारी व समाज बांधव उपस्थित होते. श्रीवर्धन तालुक्यातील खुजारे ग्रामपंचायत, बोर्लीपंचतन भंडारी समाज आणि वेळास भंडारी समाजाबरोबच तालुक्यातील 11 गाव भंडारी समाजाने चालत आलेल्या प्रचलीत अनिष्ट प्रथेबरोबरच समाजहीतासाठी काही चुकीच्या व अडचणीच्या ठरणार्या प्रथा बंद करण्याच्या घेतलेल्या सकारात्मक निर्णयाने भंडारी समाजाने सामाजिक परिवर्तनाकडे एक पाऊल पुढं टाकल्याने श्रीवर्धन तालुक्यामध्ये त्यांचे कौतूक होत आहे.