कडक सुरक्षेमुळे संघाची खराब कामगिरी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तान संघाकडून सर्वाना चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, परंतु मैदानावर संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. दरम्यान, पाकिस्तानी संघाचे संचालक मिकी आर्थर यांनी संघाच्या खराब कामगिरीबाबत धक्कादायक विधान केले आहे. त्यांनी खेळाडूंभोवती अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले आहे.
मिकी आर्थर म्हणाले, ‘आमच्यासाठी सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आम्ही अत्यंत कडेकोट सुरक्षेमध्ये आहोत आणि खेळाडूंसाठी हे खूप कठीण आहे. आपण कोविड काळात परत आल्यासारखे वाटत आहे. तुम्ही हॉटेलमधील तुमच्या मजल्यापर्यंत आणि खोलीपर्यंत मर्यादित आहात. सुरक्षेची परिस्थिती अशी आहे की आमचा नाश्ताही वेगळ्या खोलीत होतो. एवढ्या प्रदीर्घ स्पर्धेदरम्यान खेळाडूंना एकमेकांना भेटण्यात अडचण येत आहे आणि याचाही परिणाम होतो. पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशेवर मिकी आर्थर म्हणाले की, या स्पर्धेत पाकिस्तानला पूर्ण क्षमतेने खेळताना आम्ही पाहिलेले नाही. बांगलादेशविरुद्धच्या गेल्या सामन्यात आम्ही चांगली कामगिरी केली होती. संघ आपल्या लयीत आहे आणि मला आशा आहे की खूप उशीर झालेला नाही.