पालीत मंडळा शेतीचा एक अनोखा प्रयोग

पाण्याची बचत; नैसर्गिक जैवविविधतेचे संवर्धन

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यामध्ये विखूरलेली व तुकड्यांची शेती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीतून उत्पादन घेणे खूपच अवघड जाते. शिवाय यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. त्यातच अनेक ठिकाणी पाणी नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र, मंडळा शेतीच्या माध्यमातून कमी जागेत भरघोस उत्पन्न घेऊन श्रम व पाण्याची बचत करता येते. आणि नैसर्गिक जैवविविधता देखील जोपासली जाते. मंडळा शेतीचा अनोखा प्रयोग सुरु केला आहे, सुधागड तालुक्यातील उद्धर येथील प्रयोगशील शेतकरी व इको टुरिझम कर्ते तुषार केळकर यांनी.

पर्माकल्चर पद्धतीमध्ये मंडळा शेती हा एक प्रकार येतो. आणि तुषार केळकर यांनी पर्माकल्चर व त्यामध्ये येणारे मंडळा शेती प्रकार व इतर प्रकार यांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले असून, याबाबतचा कोर्सदेखील पूर्ण केला आहे आणि याची पहिली सुरुवात त्यांनी आपल्या शेतामध्ये केली असून, त्याला यश येताना दिसत आहे. तुषार केळकर यांचा मानस आहे की रायगड जिल्ह्यामध्ये मंडळा शेती बद्दल अधिकाधिक जनजागृती करणे आणि शेतकर्‍यांना मंडळा शेतीकडे वळवणे जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारची भरघोस उत्पादन घेऊन शेतकरी सुखी समाधानी होऊ शकतो. याचबरोबर पाण्याची बचत होऊन कमी पाण्यामध्ये देखील बाराही महिने उत्पन्न घेता येऊ शकते. मंडळा शेती तयार करण्यासाठी खर्च देखील आवाक्यात येतो. मंडळा रचनेत एका जागी एकत्र पूरक झाडं लावल्याने कीटक नियंत्रण नैसर्गिकरित्या होते, परागीकरण वाढते आणि उत्पादन सुधारते. रासायनिक कीटकनाशकांची गरज नाही.

सर्पिल किंवा गोलाकार पायवाटींमुळे सगळी झाडं सहज पोहचण्याजोगी असतात. त्यामुळे पाणी देणे, निंदणी, काढणी अशा कामांमध्ये कमी श्रम लागतात.
मध्यभागापासून बाहेरील थरांपर्यंत सर्पिल आकारात रस्ते त्यामुळे सर्व झाडांपर्यंत सहज प्रवेश, टाक्यापासून बांधलेल्या नळ्यांद्वारे पाणीवाहतुकीची सोय, एकाच ठिकाणी सर्व कामे (निंदणी, काढणी) त्यामुळे वेळ व श्रम कमी. प्रत्येक थरात वेगवेगळी झाडं लावल्यामुळे जंगली कीटक, पक्षी, मधमाशा यांना नैसर्गिक निवास मिळतो. परागणकर्ते आकर्षित करणे. मधमाशांसाठी सूर्यफूल, तुलसी, पक्ष्यांसाठी बेरी झाडे. जमीन सुपीक करणे वेगवेगळ्या पिकांच्या मुळांमुळे मातीत पोषकद्रव्ये मिसळतात. जैविक कीटकनियंत्रण पक्षी, साप, गोगलगायी यांना नैसर्गिक वास्तव्य मिळते. मंडळा रचनेत हंगामी, बहुवर्षीय, औषधी व फळझाडे एकत्र लावता येतात. त्यामुळे वर्षभर अन्नपदार्थ, भाज्या, फळं, औषधी मिळतात.

कमी जागेत जास्त उत्पादन

मंडळा रचना ही वर्तुळाकार थरांमध्ये असते. यामुळे प्रत्येक थरात विविध पिके लावता येतात आणि एकमेकांना पूरक राहतात. यामुळे उत्पादन अधिक होते. त्यामुळे एकाच जागी एकाधिक पिकांचे उत्पादन व जमिनीचा कमाल वापर होतो.

मंडळा शेतीची वर्तुळाकार रचना 5-7 थरांमध्ये विभागली जाते. प्रत्येक थरात वेगवेगळ्या उंचीची पिके (मुळ्या, झुडूपे, वेली, झाडे) लावली जातात. उदा. मध्यभागी फळझाडे (आंबा/पेरू), बाहेरील थरामध्ये भाजीपाला (पालक, टोमॅटो) अधिक औषधी वनस्पती ( तुळस, आले )
पाण्याचा योग्य वापर

मंडळा शेतीत पाण्याचा अपव्यय टाळला जातो. मध्यभागी पाणी साठवण्यासाठी छोटं टाकं किंवा मल्च पद्धती वापरली जाते, ज्यामुळे माती ओलसर राहते.

मध्यभागी 1-2 फूट खोल टाके बांधून पावसाचे पाणी साठवले जाते. त्याला स्वाल म्हणतात. मल्चिंग करून झाडांच्या मुळांवर कुचकामी पाने/काडीझाडे टाकून बाष्पीभवन रोखले जाते. ड्रिप सिंचन किंवा ओला-कोरडा पद्धतीने पाण्याची 50% बचत होते.

मंडळा शेती ही छोट्या शेतकर्‍यांसाठी वरदान आहे. शिवाय आता एकर साठी साधारण दहा हजार खर्च येतो पण नंतर खर्च करण्याची गरज लागत नाही. साधना देखील आपल्या आजूबाजूला मिळणारी जसे जुनी कौले, दगड, माती आदी लागतात. या पद्धतीमुळे पाणी, जमीन आणि ऊर्जेचा योग्य वापर होतो. माझा प्रयोग यशस्वी होत आहे. आता इतर शेतकर्‍यांनाही याचे प्रशिक्षण देऊन जिल्ह्याला शाश्‍वत व टिकाऊ शेतीचे मॉडेल बनवायचे आहे.

तुषार केळकर,
प्रयोगशील शेतकरी व इको टुरिझम कर्ते, उद्धर

Exit mobile version