पाच जणांविरोधात गुन्हा
। महाड । प्रतिनिधी ।
महाड मध्ये लादी बसवण्याचे काम करणार्या एका कामगाराचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले, त्यानंतर त्याला पाच जणांनी मारहाण केली या पाच जणांविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 आणि 28 मे दरम्यान ही घटना घडली आहे.
याबाबत सुनील बन्सी स्वामी (वय 26 ,मुळ राहणार राजस्थान) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुनील स्वामी हे लादी बसवण्याचे काम करत असतात. सध्या ते महाड येथील चवदार तळे येथे राहत असून सोनेरी रंगाच्या इनोवा कारमधून आलेल्या काही व्यक्तीनी त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून घरामध्ये जबरदस्तीने प्रवेश केला. घरात असलेले सुनील स्वामी यांना बळजबरीने इनोवा गाडीत बसवून माणगाव येथील सिद्धी लॉज मधील खोली नंबर 202 मध्ये डांबून ठेवण्यात आले. पळवून आणलेल्या पाच जणांनी आपण पत्रकार व पोलीस असल्याची बतावणी केली, तुझा मालक आम्हाला दीड लाख रुपये देणार होता परंतु त्याने पैसे दिले नाही या कारणास्तव मारहाण देखील करण्यात आली . तसेच त्यांच्या फोन वरून मालकाला वारंवार फोन करून मालकाकडून पैशाची मागणी करण्यात आली. फोन वरून तू पैसा लेके आ और बंदा लेके जा असे फिल्मी स्टाईलने मालकाला धमकावण्यात आले .यातून आपली सुटका करत अखेर याप्रकरणी स्वामी यांनी महाड शहर पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली असून त्यांच्या तक्रारीनुसार किशोर मुरकर, इस्माईल (पूर्ण नाव माहिती नाही). सौरभ दादा (पूर्ण नाव माहीत नाही), स्नेहल जगदाळे व ईनोवा गाडी वरील चालक ( नाव माहित नाही) या पाच जणांविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यांमध्ये खंडणीसाठी अपहरण,जबरदस्तीने घरात प्रवेश करणे, दमदाटी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलिस निरिक्षक मिलिंद खोपडे हे करत आहेत.