। पुणे । प्रतिनिधी ।
मोदी सरकारने सीबीआय, ईडी आणि निवडणूक आयोग यासारख्या यंत्रणा स्वत:च्या नियंत्रणाखाली ठेवल्या आहेत. निवडणूक रोख्यांची (इलेक्ट्रोल बाँड) यादी पाहिल्यास ईडीच्या छाप्यानंतर अनेकांनी भाजपला निधी दिल्याचे चित्र स्पष्ट होते. सीबीआय, ईडीचा दुरुपयोग राजकीय द्वेषापोटी केला जात आहे. भाजपकडून संविधानाच्या मूळ ढाच्यावरच आघात केला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात सिंघवी बोलत होते. ते म्हणाले, वादविवाद घडविणारा, त्रासदायक ठरणारा संविधानाचा ढाचा सरकारने तयार केला आहे. सध्या सरकारकडून आणखी एक नवीन व्यवस्था अवलंबली जात आहे. निवडणुकीचे ‘सिलेक्शन’मध्ये रूपांतर होत आहे. सुरतमध्ये अन्य उमेदवारांनी माघार कशी काय घेतली. हे असेच सुरू राहिल्यास निवडणुकीची गरज पडणार नाही आणि तो लोकशाहीचा अंत असेल. प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवण्याचा केला जाणारा सरकारचा प्रयत्न भयावह आहे.लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असल्याचे खुद्द मोदीच सातत्याने बोलत असल्याचेही सिंघवी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, सध्याच्या भाजपने जुन्या भाजपची ओळख मिटवून टाकली आहे. सध्या देशात नियंत्रित लोकशाही आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधानांना ते शोभत नाही.