आशा सेविकांच्या मागण्या मान्य करा : नीलम गोंधळी

चिपळूण । प्रतिनिधी ।  
कोरोना विरुद्धच्या लढाईत आघाडीवर असणार्‍या आशा सेविकांच्या मानधन, सुरक्षा व विमा कवचाबाबतच्या मागण्या राज्य  सरकारने  तातडीने मान्य कराव्यात,असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. नीलम गोंधळी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आशा सेविकांच्या आंदोलनाला भाजपा महिला मोर्चाचा संपूर्ण पाठिंबा आहे. कोरोना काळात आशा सेविकांनी गेले दीड वर्षे  काम केले आहे. अजूनही करत आहेत. आरोग्य सुरक्षा नसताना,विमा कवच नसताना,योग्य मानधन मिळत नसतानाही आशा सेविका काम करीत आहेत. मास्क, पीपीई किट, ग्लोव्हज, सॅनिटाझर पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. अनेक आशा सेविकांचे व त्यांच्या कुटुंबियांचे कोरोनामुळे मृत्यू झाले.नियमानुसार चार तास काम करणे अपेक्षित असताना 12 तास काम करावे लागते आहे, मात्र या कामाची राज्य सरकारला किंमत नाही.    

कोरोना रुग्णांच्या सर्वेक्षणाबरोबर लसीकरण मोहिमेतही राज्य सरकारने आशा सेविकांचा समावेश केला. मात्र अजून या कामाचा पुरेसा मोबदला दिलेला नाही. आता तरी राज्य सरकारने आशा सेविकांच्या मागण्यांची पूर्तता करावी. आशा सेविकांच्या  मागण्या मान्य करण्याची आश्‍वासने अनेकदा मिळाली आहेत. मात्र ही आश्‍वासने न पाळून सरकार आशा सेविकांची फसवणूक करत आहे.  आशा सेविकांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी राज्य सरकारने घेतलेली  नाही. राज्य सरकारने गेल्या वर्षीपासूनच प्रोत्साहन भत्ता प्रतिदिन 500 रु. प्रमाणे द्यावा,अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली. या संदर्भात उपमुख्यमंत्री,आरोग्यमंत्र्यांशी चर्चाही झाली.मात्र राज्य सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे, असेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे

Exit mobile version