। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या दोन बसचा विचित्र अपघात गणपतीच्या पहिल्याच दिवशी (दि.10) झाल्याचे वृत्त आहे. सकाळी साडे नऊच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
पालघरमधील या अपघातात दोन्ही बसमधील मिळून जवळपास 50 प्रवासी जखमी झाले आहेत. तर,सध्या या जखमींना उपचारासाठी विक्रमगड ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. हा अपघात हा विक्रमगड तालुक्यातील आलोंढे या गावाजवळ घडला. रस्त्यातील वळण वेळीच लक्षात न आल्याने दोन्ही बस समोरासमोर येऊन हा अपघात घडला असल्याचे सांगण्यात आले.
डहाणू – ठाणे आणि वाडा-जव्हार बस या दोन्ही बस समोरासमोर येऊन धडकल्याने हा भीषण अपघात झाला आहे. विक्रमगडवरून वाडाकडे जाणारी डहाणू-ठाणे-सातारा बस आणि वाड्यावरून येणारी वाडा-जव्हार बस या कोकणी पाडा येथील राईसमिलजवळ एकमेकांना धडकल्या. या अपघाताची भीषणता इतकी होती की, बस अक्षरश: चिरली गेली आहे. एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हा संपूर्ण अपघातात कैद झाला आहे. दरम्यान, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, 50 जखमींपैकी काहींना गंभीर दुखापत झाल्याची शक्यता आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.