। रायगड । प्रतिनिधी ।
जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर, घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल, शिक्षण व आरोग्यावरील खर्च आदींमुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडलेले आहे. अशातच महावितरणकडून नियमित वीज बिलासह अतिरिक्त सुरक्षा ठेव, अशी दोन बिले मिळाल्याने ग्राहकांना शॉक बसला आहे. रायगड जिल्ह्यात असणार्या सर्व ग्राहकांना अतिरिक्त बिलाचा फटका बसला आहे. महावितरणने नियामक आयोगाकडे मागितलेली वीजदरवाढ तुर्तास टळली, अन्यथा एप्रिल महिन्यातच ती लागू झाली असती. यात सामान्य ग्राहक वाचला असला तरी एप्रिल महिन्यात नियमित वीज बिलासह अतिरिक्त सुरक्षा ठेव, अशी दोन बिले मिळाल्याने ग्राहकांना शॉक बसला आहे.
नियमित वीज बिल भरणार्या सामान्य घरगुती ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव आम्ही का भरायची? असा सवाल पडला आहे. महावितरण अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या नावावर पुन्हा ग्राहकांकडून पैसे ओरबाडण्याचा प्रकार करीत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. यापूर्वी सुरक्षा ठेवीची रक्कम एका महिन्याच्या बिलाइतकी होती; मात्र नवीन नियमांनुसार एप्रिल 2022पासून दुप्पट म्हणजे दोन महिन्यांच्या बिलाइतकी करण्यात आली आहे. ग्राहकांना 400 ते 500 रुपयापर्यंत येणारे वीज बिल आता ते एक हजार ते एक हजार 200 रुपयांपर्यंत गेले आहे. वीज बिल जास्त येत असल्याच्या तक्रारी सामान्य घरगुती ग्राहकांच्या नेहमीच्याच झाल्या आहेत. असे असतानाही महावितरण ग्राहकांवर आर्थिक ओझे लादण्याचा प्रकार करीत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
वीज बिलाचा कमी वापर असलेल्या ग्राहकांना एक हजार 300 ते दोन हजार 500 रुपयापर्यंत; तर काहींना यापेक्षाही जास्त अतिरिक्त सुरक्षा ठेवचे बिल मिळाले आहेत. जे ग्राहक नियमित वीज बिल भरतात, त्यांच्यासाठी सुरक्षा ठेवीची ही भानगड नको, असा संताप पनवेलमधील ग्राहकांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता 2021च्या कलम 13.1 नुसार, वीज ग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारली जाते. सुरक्ष ठेव नियमाने बंधनकारक आहे. दरवर्षी सुरक्षा ठेवची पुनर्गणना केली जाते. त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर नवीन रक्कम ग्राहकाच्या मागील एका वर्षातील सरासरी वीज वापराच्या आधारे निर्धारित केली जाते. ही अतिरिक्त सुरक्षा ठेव नियमानुसार असून त्याचा वीज ग्राहकांनी भरणा करावा.
महावितरणकडून जनतेची लूट सुरू आहे. मला सुरक्षा ठेवीच्या नावाखाली नियमित बिल सोडून अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून अतिरिक्त बिल आले आहे. वीज वितरण कंपनीचा हा भोंगळ कारभार सुरू आहे. वीज ग्राहकांना कोणीच वाली उरला नाही. आधीच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे.
प्रमोद धनावडे,
वीजग्राहक, महानवाडी
सतत वाढत जाणार्या विजेच्या बिलांमुळे वीजग्राहक हैराण झाले आहेत. वीज जोडणी घेताना सुरक्षा ठेव म्हणून काही रक्कम घेतली जाते. नंतर अतिरिक्त सुरक्षा ठेव कशी काय घेतली जाते, याविषयी वीजवितरण कंपनीच्या धोरणाबद्दल ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
चंद्रकांत बामणे,
वीजग्राहक, रामराज.