झेलम खवळली, पाकिस्तानात आणीबाणी
। पहलगाम । वृत्तसंस्था ।
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. दुसरीकडे पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ रणगाड्यांची मोठी कुमक पाठवली आहे. या हल्ल्यानंतर सिंधू पाणी करार रद्द करण्याचा भारताच्या निर्णयाने पाकिस्तान हादरला आहे. तर आता झेलम खवळल्याने पाकिस्तानमधील अनेक भागात पूरस्थिती झाली आहे. प्रशासनाने आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे. भारतावर तिथला मीडिया आगपाखड करत आहे. जम्मू काश्मिरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची साडेसाती सुरु झाली आहे.
भारताने अचानक झेलम नदीत पाणी सोडल्याने पाकिस्तानात महापूर आल्याचा दावा तिथल्या मीडियाने केला आहे. झेलम नदीला पूर आल्याने मुझफ्फराबाद परिसरात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. भारताने पूर्वसूचना न देता अचानक पाणी सोडल्याने परिसरात पूर आल्याचा ठपका पाकिस्तान प्रशासनाने ठेवला आहे.
पाकिस्तानी मीडियाच्या दाव्यानुसार अचानक पाणी सोडल्याने मुझफ्फराबाद परिसरातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली. हट्टियन बाला भागात पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली. मशिदींमधून नागरिकांना बाहेर न पडण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. झेलमचे पाणी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात घुसले आणि पाक व्याप्त काश्मीरमदील चकोठी परिसरात त्याने मोठा हाहाकार उडवला. त्यानंतर पुराने पाकिस्तानमधील अनेक भागांना व्यापले.
सिंधू पाणी करार रद्द करण्याची अधिसूचना
भारताने पाकिस्तानला सिंधू पाणी करार रद्द करण्याची अधिकृत माहिती दिली आहे. याविषयीची औपचारिक अधिसूचना पाकिस्तानला देण्यात आली आहे. गुरुवारी याविषयीचे कागदपत्रे पाकिस्तानला सोपवण्यात आली. पाणी पातळी, पाण्याचा एकूण साठा, पाणी सोडण्याबाबतच्या सूचना, नवीन जलयोजना, त्यासंबंधीच्या बैठका, आकडेवारी वा पाण्याविषयीची कोणतीही माहिती देण्याबाबतचे सर्व नियम, हरकती रद्द करण्यात आल्या आहेत. आता हा करार रद्द केल्याने भारताला नवीन जलयोजना राबवण्यासाठी पाकिस्तानची अनुमती घेण्याची गरज नाही. दरम्यान पाकिस्तानच्या लष्कराने गेल्या दोन दिवसांपासून नियंत्रण रेषेवर आगळीक केली आहे. या भागात सातत्याने गोळीबार करण्यात येत आहे. तर पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ हालचाली वाढल्या आहेत. सीमेवर रणगाडे तैनात करण्यात येत आहे.
भारताचे म्हणणे काय?
वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, साउथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स रिव्हर्स अँड पीपल (एसएएनडीआरपी) चे हिमांशू ठक्कर म्हणाले की, खरी समस्या पश्चिमेकडील नद्यांशी संबंधित आहे. जिथे पायाभूत सुविधांच्या मर्यादा आपल्याला पाण्याचा प्रवाह त्वरित थांबवण्यापासून रोखतात. चिनाब खोर्यात आमचे अनेक प्रकल्प सुरू आहेत, जे पूर्ण होण्यासाठी पाच ते सात वर्षे लागतील. तोपर्यंत नैसर्गिक कारणांमुळे पाणी पाकिस्तानकडे वाहत राहील. एकदा हे कार्यान्वित झाले की, भारतात एक नियंत्रण यंत्रणा असेल जी सध्या अस्तित्वात नाही. पर्यावरण कार्यकर्ते आणि मंथन स्टडी सेंटरचे संस्थापक श्रीपाद धर्माधिकारी म्हणाले की, भारत पाण्याचा प्रवाह लवकर वळवू शकतो. सध्या, पाकिस्तानमध्ये पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा आपल्याकडे अभाव आहे.