। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रजासत्ताक दिनाबरोबरच महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मान पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्या, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना मिळाला आहे. मंत्री भरत गोगावले यांना पुन्हा त्यांच्याच सरकारकडून गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे गोगावलेंना दुय्यम स्थानावर समाधान मानण्याची वेळ आली आहे. पालकमंत्रीपद मलाच मिळणार या आशेवर असलेल्या गोगावले यांना मुद्दाम डावलले असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात सुरु आहे.
मागील सरकारमध्ये रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना मिळाले होते. त्यावेळी शिंदे गटातील भरत गोगावले यांच्यासह आ. महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांनी विरोध केला होता. त्यासाठी रास्ता रोकोदेखील करण्यात आला होता. त्यामुळे आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपदावरून पायउतार होण्याची वेळ शिंदे गटातील नेत्यांमुळे आले. पालकमंत्री तुम्हीच अशी चावी गोगावले यांना दळवी यांनी मारली. त्यामुळे पालकमंत्रीपदावरून गोगावले विरुद्ध तटकरे यांचा वाद विकोपाला पोहोचला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एकमेकांविरोधात भाषणात टोले मारणे, संस्कृती काढणे यासारखे प्रकार तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडले.
नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार आल्यावर पालकमंत्रीपद वाटपाचा कार्यक्रम पार पडला. मात्र, अनेक महिने उलटूनही रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. पालकमंत्रीपद मिळावे, यासाठी गोगावले यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मागील एका कार्यक्रमातदेखील आपणच पालकमंत्री होणार असा विश्वास व्यक्त केला. परंतु, त्यांना रोजगार हमीचे मंत्रीपद देऊन शांत करण्याचे काम महायुतीमधील पक्षश्रेष्ठींनी केल्याची चर्चा आहे. नवीन सरकार बसल्यावर ध्वजारोहणाचा मान गोगावले यांना मिळेल, असे शिंदे गटातील कार्यकर्त्यांना वाटले होते. परंतु, तो मान आदिती तटकरे यांना देण्यात आला होता. त्यामुळे मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला गोगावलेंना मुकावे लागले. महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मान गोगावले यांना मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शासनाने परिपत्रक जाहीर करीत महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा रायगड जिल्ह्यातील मान महिला व बालविकास मंत्री आदीती तटकरे यांना दिला आहे. आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. या प्रकारामुळे गोगावलेंना पुन्हा एकदा सरकारनेच गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. रोजगार हमीचे मंत्रीपद दिल्यानंतर गोगावले यांना ध्वजारोहणचा मान मिळेल, अशी आशा शिंदे गटातील दळवींसह थोरवे यांना होती. परंतु, हा मान राष्ट्रवादीच्या आदितीत तटकरे यांनाच दिल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीपेक्षा शिंदे गटाचे आमदार जास्त आहेत. त्यामुळे त्यांनाच पालकमंत्रीपदाचा मान मिळाला पाहिजे, असा दावा शिंदे गटाकडून कायमच कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जात आहे. परंतु, शिंदे गटाला डावलले जात असल्याचे या प्रकारातून पुन्हा एकदा स्पष्ट होत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.