| कर्जत | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींची मुदत 17 फेब्रुवारी रोजी संपली आहे. त्यामुळे त्या सर्व 11 ग्रामपंचायतीवर रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून प्रशासक नेमण्यात आले आहेत. दरम्यान, उद्यापासून त्या 11 ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त सदस्य मंडळ नसणार आहे. त्यामुळे शासनाने नियुक्त केलेले प्रशासक यांच्यामार्फत कारभार होणार आहे. तालुक्यातील 17 फेब्रुवारी 2024 रोजी मुदत 11 ग्रामपंचायतवर प्रशासक नेमले आहेत. तालुक्यातील आसल, माणगावतर्फे वरेडी, शेलू, पिंपलोळी, मानिवली, पाषाणे, वारे, कशेले, बीड बुद्रुक, सावळा हेदवली आणि मोग्रज या 11 ग्रामपंचायती यांची मुदत संपली आहे. त्यामुळे तेथे आता लोकनियुक्त सदस्य मंडळ यांचे अधिकार संपले आहेत.
शासनाच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील मुदत संपलेल्या 11 ग्रामपंचायतमध्ये रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी प्रशासक यांची नावे निश्चित केली आहेत. त्या सर्व 11 प्रशासक यांनी 18 फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारायचा असून कर्जत पंचायत समितीकडून तसे आदेश देण्यात आले आहेत.
आसलमध्ये कर्जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता सुशांत गोरे, माणगावतर्फे वरेडीमध्ये पंचायत समितीमधील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशोक तिडके, शेलू ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समितीचे कृषी अधिकारी एस.यु. चव्हाण, पिपंलोलीमध्ये पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सी.डी. पाटील, मानिवलीमध्ये पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रमोद गायकवाड, पाषाणेमध्ये पंचायत समितीचे कृषी अधिकारी चिंतामण लोहकरे, वारेमध्ये पंचायत समितीचे शाखा अभियंता के. एम. परब, कशेलेमध्ये ग्रामपंचायत विस्तार अधिकारी उज्ज्वला भोसले, बीड बुद्रुकमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक दिलीप मेंगाल, सावळा-हेदवलीमध्ये आयसिडीएस विभागाच्या विस्तार अधिकारी अनिता ढमढरे, मोग्रजमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशोक तिडके यांना प्रशासक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.