शासकीय दंडाच्या वसुलीसाठी उपोषण

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील मल्याण येथे बेकायदेशीर बांधकाम करणारे शरद गावंड व नंदकुमार गायकर यांना शासनाने केलेला दंड आजपर्यंत न जमा केल्याने सुमन कोळी, नारायण कोळी आणि डॉ. मनोज कोळी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिराकोट तलाव येथे उपोषण सुरू केले आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की मल्याण येथील शरद रामभाऊ गावंड व नंदकुमार कमलाकर गायकर या दोघांनी अनधिकृत उत्तखनन करून बेकायदेशीर वीटभट्टी लावून विटा पाडून शासनाचा कर बुडविला आहे. याबाबत निर्णय होऊन त्यांना 1 लाख 85 हजार 280 रुपये इतका दंड ठोठावून सुद्धा आजपर्यंत दंडाची रक्कम जमा केली नाही. तक्रारदार हे दोघेही जेष्ठ नागरिक आहेत. त्यांच्या मल्याण येथील मालकीच्या हक्काच्या जागेचा अधिकार प्राप्त होण्यासाठी न्याय व्यवस्थेबरोबर झगडावे लागत आहे. तक्रारदार यांच्या मालकीच्या मिळकतीची नासाडी शरद गावंड व आदेशावर स्थगिती देऊन परत नव्याने नंदकुमार गायकर यांनी केली आहे. त्यामुळे गेली चार वर्षांपासून शेती पडीक ठेवावी लागली आहे. सदरची बाब ही अलिबाग तहसीलदार यांना सुनावणीच्या वेळी निदर्शनास आणून दिली आहे. अलिबाग उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या न्यायनिर्णयामध्ये तहसीलदार अलिबाग यांच्या सुनावणी घेण्याचे आदेश केलेले होते. त्यामध्ये देखील आजपर्यंत कोणतेही योग्य पाऊले उचलले गेले नाही.

शासनाकडून आदेश होऊनही देखील त्यांची पुर्तता होत नाही. उपोषणकर्त्यांना त्यांना त्याच्या मिळकतीचा उपभोग घेता येत नसून त्याच्या शेतीची नासाडी व जमिनीचा पोत शरद रामभाऊ गावंड व नंदकुमार कमलाकर गायकर यांच्या बेकायदेशीर व अनाधिकाराच्या वागण्यामुळे ही वस्तूस्थिती निर्माण झालेली असल्याचे या निवेदनात सुचित करण्यात आलेले आहे.

Exit mobile version