राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
विद्यापीठामधून होणारे संशोधन आणि शेतकर्यांचे व्यवहारज्ञान यांची सांगड घालून येणार्या काळात परस्पर सामंजस्याने शेतकरी संपन्न झाला पाहिजे. बाजारात जे विकले जाते ते पिकेल या धोरणानुसार सर्वांनी काम करावे. अशा प्रदर्शनातून याला बळ मिळेल असा आशावाद राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सुवर्ण पालवी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल महोदयांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
रत्नागिरी जिल्ह्याला निसर्गाने भरभरुन दिले आहे. एका बाजूला डोंगररांगा दुसर्या बाजूला सागर किनारा असणार्या या जिल्ह्याची हापूस आंब्यामुळे संपूर्ण जगभरात ओळख आहे. यापूर्वीच्या काळात शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून अनेक योजना राबविल्या. प्रथम श्वेतक्रांती नंतर हरित क्रांती आणि आता निलक्रांती धोरण स्वीकारण्यात आले आहे, असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले.
यंदा मान्सून चांगला राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे आणि आताच्या स्थितीनुसार मान्सून लवकर येण्याचीही शक्यता आहे. या स्थितीत राज्यातील शेतकर्यांना गरजेनुसार खते आणि बियाणे पुरविण्यास शासन तयार आहे असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी स्वागतपर भाषणात कुलगुरु डॉ. सावंत यांनी विद्यापीठाची आतापर्यंतची वाटचाल आणि भविष्यातील नियोजन याबाबत माहिती दिली. त्यासोबत या प्रदर्शनाच्या आयोजनाची भूमिका मांडली.
प्रत्यक्षात शेती करणार्या शेतकर्यांकडे व्यावहारिक ज्ञान मोठ्या प्रमाणावर आहे तर विद्यापीठात शेती विषयक विज्ञान व संशोधन आहे. याची सांगड घालण्याचा प्रयत्न या चार दिवस चालणार्या प्रदर्शनात व्हायला हवा.
भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल
