अनामत रक्कम, दरमहा भाडे देण्याची शेतकर्यांची मागणी
| नागोठणे | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या कानसई नागोठणे ते डोलवी येथील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीत 400/220 के.व्ही. ही उच्च वीजदाब वाहिनी नेण्याचे काम येत्या काही दिवसांत सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकर्यांच्या जागेतून ही उच्च वीज दाबाची वाहिनी जाणार आहे, त्या शेतकर्यांच्या जमिनी कवडीमोल होणार आहेत. त्यामुळे संबंधित वीजवाहिनी नदीकिनारीमार्गे नेण्यात यावी तसेच संबंधित बाधित शेतकर्यांना एकरकमी अनामत रक्कम व जमिनीचे दरमहा भाडे देण्यात यावे, अशी मागणी नागोठण्याजवळील पळस ग्रामपंचायत हद्दीतील पळस, शेतपळस, बाहेरशिव, वाघळी व निडी येथील शेतकर्यांनी रोहा तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रोहा तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांना यासंबंधीचे निवेदन शेतकर्यांनी नुकतेच दिले असून, यावेळी शिवसेना (उबाठा) रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे, नागोठणे उपविभाग प्रमुख ज्ञानेश्वर शिर्के, कोंडगावचे माजी सरपंच धर्मा भोपी, पळस शाखाप्रमुख चंद्रकांत दुर्गावले, उपशाखाप्रमुख विक्रम दुर्गावले, शशिकांत शिर्के, अजित शिर्के, हरिश्चंद्र मढवी, रामू कदम, शिवराम कदम, पळस ग्रा.पं.सदस्य सतिश डाकी, नितीन घासे चंद्रकांत बोरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय विचारे, परेश विचारे, सचिन शेलार, नितीन शिर्के, गणेश म्हात्रे, सचिन बोरकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.
उच्च वीज दाबाचा पुरवठा करणारी ही विद्युत वाहिनी नागोठण्याजवळील कानसई येथील उपकेंद्रातून डोलवी (ता.पेण) येथील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीत नेण्याचे काम प्रस्तावित आहे. 30 किलोमीटर लांबीच्या या वीजवाहिनीचे सर्वेक्षण करताना शेतकर्यांना विश्वासात घेतले नाही, असा आरोप करण्यात येत आहे. या उच्चदाब वाहिनीपासून दोन्ही बाजूकडील मोठ्या प्रमाणातील शेती बाधित होऊन नुकसान होणार आहे, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे. बाधित शेतकर्यांना पटविण्यासाठी गावातील पुढारी असलेल्या दलालांना ठेकेदाराकडून नेमण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शेतकर्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्यांच्याकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.