कृषी कायदे पुन्हा आणले जाऊ शकतातः केंद्रीय कृषीमंत्री

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशाच्या शेती क्षेत्रात महत्त्वाकांक्षी सुधारणा घडवून छोट्या शेतकर्‍यांच्या आर्थिक प्रगतीचा दावा करणारे तीनही वादग्रस्त कृषी कायदे रद्द केल्यानंतर केंद्रीय कृषीमंत्र्यांनी आता मोठे विधान केले आहे. हे तीनही कृषी कायदे पुन्हा आणले जाऊ शकतात असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबरला देशाला संबोधित करताना कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली होती. यानंतर संसदेतही विधेयक मंजूर करण्यात आले. यासोबत दिल्लीच्या वेशींवर वर्षभर ठिय्या देणार्‍या शेतकरी पुन्हा आपल्या घरी परतले. तोमर यांनी यावेळी कायदे रद्द होण्यासाठी काही लोक जबाबदार असल्याचे म्हटले. तसेच हे तीनही कृषी कायदे पुन्हा नव्याने आणले जाऊ शकतात असे सांगितले. आम्ही कृषी सुधारणा कायदे आणले. पण काही लोकांना हे कायदे आवडले नाहीत. हे कायदे स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मोठे बदल घडवणारे होते, असे तोमर यांनी म्हटल आहेे, पण सरकार निराश नाही. शेतकरी आपल्या भारताचा कणा आहेत त्यामुळे आम्ही एक पाऊल मागे घेतले असून, पुढेदेखील टाकू, असे तोमर यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version