। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारी सुरू झाल्यानंतर गदारोळात लोकसभेत कृषीविषयक कायदे मागे घेण्याचे विधेयक मंजूर झाले आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी मांडल्यानंतर लोकसभेने शेती कायदे रद्द करण्याचे विधेयक कोणत्याही चर्चेविना मंजूर केले. लोकसभेने कोणतीही चर्चा न करता शेत कायदे निरसन विधेयक, 2021 मंजूर केले. यानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी या विधेयकावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली होती. लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांचा गदारोळ पुन्हा सुरू झाला होता. या गदारोळात कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी कायदा निरसन विधेयक मांडले होते.
विरोधकांची निदर्शने
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात सोमवारी संसद भवन संकुलात निदर्शने केली. महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर जमलेल्या काँग्रेस सदस्यांनी आम्ही काळे कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करतो असे म्हटले.