उरणमधील अक्कादेवी धरण प्रवाहीत

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील जनतेला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई व पुनाडे धरण परिसरात पावसाची जोरदार सरी कोसळत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. ऐतिहासिक चिरनेर गावाजवळ तीन डोंगररांगांच्या कुशीत वसलेले अक्कादेवी धरण हे एक अतिशय निसर्गरम्य आणि सुरक्षित वर्षा सहलीचे ठिकाण आहे. पावसाळ्यात येथील फेसाळणारे धबधबे आणि हिरवागार परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. ते अक्कादेवी धरण सततच्या पावसामुळे प्रवाहीत झाल्याने तरुण वर्ग विशेष करून पर्यटक सुखावला आहे.

जून महिन्यापासून धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणीसाठा चिंताजनक पातळीवर होता. मात्र, जुलै महिना उजाडताच 24 तासांत झालेल्या पावसामुळे उरण तालुक्यातील रानसई व पुनाडे या दोन धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली असून, त्याचा सकारात्मक परिणाम एकूण साठ्यावर दिसून आला आहे. दरम्यान, सध्याचा पाणीसाठा अद्यापही समाधानकारक नसल्याने पुढील काही दिवस धरण क्षेत्रात चांगला पाऊस होणे आवश्यक आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील 25 सप्टेंबर 1930 च्या चिरनेर जंगल सत्याग्रहाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक प्रसिद्ध चिरनेर गावातील अक्कादेवी धरण हे जुलै महिन्यात प्रवाहीत झाल्याने तरुण वर्ग, निसर्ग प्रेमी विशेष करून पर्यटक सुखावला आहे.

Exit mobile version