अलिबागचा खारेपाट ही नररत्नांची खाण

बळवंत वालेकर 

अलिबाग तालुक्यातील सांबरी ते रेवस ही 84 गावे खारेपाट विभागात मोडतात. येथे शेती हा मुख्य  व्यवसाय असून  काहींचा  मच्छी पकडणे हा  दुय्यम  व्यवसाय आहे.  येथे  आगरी जातीचे प्राबल्य  असुन  कोळी, माळी, गौळी, भंडारी, ब्राह्मण मारवाडी, गुजराथी, नवबौद्ध तसेच  आदिवासी   देखील आहेत. 50 वर्षांपूर्वी  येथे  गोड्या  पाण्याची  व दळणवळणाची सुविधा नव्हती.  आरोग्य  सुविधा  तर  कोसो दूर  होती.  पण येथील भूमीपुत्र बेडर आहे. अन्यायाची  त्याला चीड आहे.  मोडेन पण वाकणार नाही ही प्रव्रुत्ती.आहे. तो तिखट स्वभावाचा आहे. पण भजन-कीर्तनात रमणारा आहे.  राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व आध्यात्मिकतेची मुळात आवड आहे. येथील  भूमिपुत्रांना शिक्षणाची  मुळात आवड असल्यामुळे   पारतंत्र्य काळात गावागावात शाळा काढल्या. त्यात मुलींच्या  शिक्षणास प्राधान्य  दिले.  म्हणून शहाबाज येथे पारतंत्र्य काळात  1865  साली मुलांची तर 1913 साली मुलींची  प्राथमिक शाळा सुरु केली. गावोगावी शाळा असल्यामुळे   अनेक नररत्ने उदयास  आली.   त्यांनी  खारेपाटाचे नाव महाराष्ट्र भर, भारतभर तर काहींनी   सातासमुद्रा  पलिकडे  नेले..
50 वर्षापूर्वी  दळणवळणाची सोय नसलेला, गोड्या पाण्याची  सुविधा  नसलेला, शेताच्या  बांधावरील चिखलातील  पाऊलवाट हीच वहिवाट असलेला, 5/7 किलोमीटर  दूर  अंतरावरून  डोक्यावरून  पाणी  वाहून  आणणारा  येथील भूमीपुत्र शिक्षण व राजकीय दृष्ट्या विशेष  जागृत  होता  व आहे.  धेरंड  (शहापूर)  या बेटवजा गावात 140 वर्षापूर्वी नारायण नागू पाटील हे नररत्न जन्मले. तल्लख बुद्धी व अगाध स्मरणशक्ती असल्यामुळे अनंत समस्यांना तोंड  देत  शिष्यवृत्तीधारक बनले. शिवाय मॅट्रिक परीक्षेत  प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. सावकारांकडून  शेतकरी  वर्गावर होणारा, अन्याय दूर होण्यासाठी कोकण कृषीवल   हे साप्ताहिक (1937 साली ) सुरू  केले.  तेच आजचे दै. कृषीवल होय. सावकारशाही नष्ट होण्यासाठी चरी संप  घडविला. पारतंत्र्य काळात   आमदारकी भूषवित असताना शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर मुंबई  विधीमंडळ गाजविले. शे.का.पक्ष कुलाबा जिल्ह्यात  मजबूत करताना जिल्हा  लोकल बोर्डाचे अध्यक्षपदही भूषविले.
महात्मा गांधीजींची  स्वातंत्र्य  चळवळ तळागाळात रुजण्यासाठी या भागातील पहिले वकील लक्ष्मणराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली खारेपाटातील तरूण वर्ग जागा झाला. ब्रिटिशांना त्रास देण्यासाठी टेलिफोनच्या तारा तोडीत. कायदाभंग करण्यासाठी   तिनविरा येथे  जंगल  सत्याग्रह  केला. लक्ष्मणरावांनी  पारतंत्र्यकाळात आमदारकीही  गाजविली.  स्वातंत्र्य चळवळीत  दामोदर नारायण (दामू अण्णा) पाटील (वाघ्रण), गजानन  नारायण  पाटील (रांजणखार), नथुराम पोशा पाटील (हाशिवरे) इ. सहकार्‍यांचा सहभाग होता.  स्वातंत्र्य  मिळाल्यानंतर दत्ता पाटील  (शे.का.प.) 1957 साली आमदार  झाले. ते 27 वर्षे  आमदार  होते. विरोधी पक्ष नेतेपदही त्यांनी भूषाविले.  मीनाक्षी पाटील (शे. का. प)  आमदार  होऊन  राज्यमंत्रीपदही त्यांनी  भूषविले. आता शे.का.प.  सरचिटणीस जयंत पाटील आमदारकी भूषवित असून त्यांचे बंधू पंडित  पाटील हे सुद्धा आमदार होते.  हाशिवरे येथील  सुविद्य महिला चंपूताई मोकल काँग्रेसतर्फे  ठाणे शहरातून आमदार झाल्या तर डॉ. चंद्रकांत मोकल दापोली येथून काँग्रेसचे आमदार  झाले.  शहापूर येथील डॉ. काका पाटील यांना शे.का.प.तर्फे  आमदारकीची संधी मिळाली.
लोकाभिमुख प्रतिनिधित्व
खारेपाट विभागातर्फे ना. ना. पाटील कुलाबा जिल्हा  लोकल  बोर्डावर निवडून गेले व अध्यक्षपदही भूषविले. डॉ. काका पाटील (शहापूर) व शांताबाई मोकल (हाशिवरे)  यांनीही जिल्हा लोकल बोर्डाचे  प्रतिनिधित्व केले.
1962 साली जिल्हा लोकल बोर्ड इतिहासजमा होऊन जिल्हा परिषद अस्तित्वात  आली. हरी रामा माळी (शहाबाज) यांनी शे. का.प. तर्फे तर मणीभाई मेहता (सारळ) यांनी काँग्रेसतर्फे कुलाबा जिल्हा  परिषदेचे प्रथम प्रतिनिधित्व  केले.  त्यानंतर  दामूअण्णा पाटील (काँग्रेस),  शं.ना.मोकल (काँग्रेस), प्रभाकर पाटील, मीनाक्षी पाटील, जयंत पाटील, पंडित पाटील, सौ. सुप्रिया पाटील,  सौ. चित्रा पाटील,  जगन्नाथ पाटील, अ‍ॅड. आस्वाद  पाटील, सौ. भावना पाटील (सर्व शे.का.प.) तसेच प्रकाश धुमाळ (काँग्रेस) यांनी  जिल्हा  परिषदेत प्रतिनिधीत्व केले. पैकी प्रभाकर पाटील (11 वर्षे), सौ. सुप्रिया पाटील,  पंडित पाटील यांनी  जिल्हा  परिषदेचे अध्यक्षपद तर प्रकाश धुमाळ व अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी   उपाध्यक्षपद भूषविले.
 बेडरवृत्तीचा भूमीपुत्र
शैक्षणिक  व राजकीय  क्षेत्रात खारेपाट अग्रेसर आहे.  पारतंत्र्य काळापासून येथे  गाव तेथे शाळा हे धोरण अवलंबिले गेल्यामुळे सर्वत्र शिक्षणाचा प्रसार  झाला.  संपूर्ण कुलाबा (विद्यमान रायगड) जिल्ह्यास शिक्षक पुरविणार्‍या शहाबाज येथे 155 वर्षांपूर्वी (1865 साली) प्राथमिक  शाळा तर 1913 साली मुलींची शाळा चालू झाली. या  शैक्षणिक  प्रगतीमुळे अनेक तरुण उच्च विद्याविभूषित झाले  व उच्चपदी पोचले.  सुप्रसिद्ध साहित्यिक  व समीक्षक डॉ. एम.एस.मधुकर सुदाम पाटील (शहाबाज) यांनी  मालेगाव (जिल्हा नाशिक) येथील महाविद्यालयाचे प्राचार्यपद भूषविले. खिडकी या छोटेखानी गावात  अनेक  तरुण पदवीधर व द्विपदवीधारक आहेत. प्रा. एम.पी. (मधुकर पोसू) पाटील  यांनी पालघर येथील महाविद्यालयाचे प्राचार्यपद तर मराठी भाषेचे थोर समीक्षक प्रा.गंगाधर पाटील  यांनी  मुंबई  येथील के. सी.  कॉलेजच्या मराठी विभागाचे प्रमुखपद सांभाळले. सातघर येथील सदाशिव नथोबा आठावले यांनी  कुर्डूवाडी (जि. अहमदनगर) येथील महाविद्यालयाचे  प्राचार्यपद भूषविले. ते इतिहासाचे गाढे अभ्यासक  असल्यामुळे  जगातील  अनेक  महाविद्यालयाकडून  व्याख्यानासाठी निमंत्रणे येत  असत.  जागतिक कीर्तीचे तत्वज्ञ  व क्रांतिकारक न्यायरत्न धुंडिराज गोविंद विनोद हे केतकीचा मळा या गावचे सुपुत्र. 1954 साली जपान  येथे भरलेल्या विश्‍वशांती परिषदेचे ते सचिव होते.  त्यांना  कोलंबिया  विद्यापीठाने  डॉक्टरेट दिली होती. कुसुंबळे येथील अनिल कमलाकर पाटील अलिबाग येथील  जे. एस.एम.महाविद्यालयाचे माजी, विद्यार्थी  व  विद्यमान  प्राचार्य आहेत. तसेच  अनेक  क्षेत्रालाउच्च विद्याविभूषित तरुण कार्यरत आहेत. शीघ्र कवि व लावणीकार   राघोबादादा कोपरकर हे कोपरचे. कोकण कृषीवल साप्ताहिकाचे पहिले संपादक  नथुराम रामचंद्र थळे हे सुद्धा कोपरचे.  सुप्रसिद्ध  लेखक  कवि व चित्रकार शंकर सखाराम आणि  संगीतकार अच्युत ठाकूर हे सुद्धा कोपरचेच. लोकप्रिय  संगीतकार व नेपथ्यकार शांता राम बुवा पाटील वाघ्रणचे.  शहाबाज येथील प्रभाकर गंगाराम पाटील संपादित कुलाबा मानस हे खारेपाटातील दुसरे साप्ताहिक. कालांतराने ते बंद पडले. बळवंत वालेकर (वाघोली) संपादित  कुलाबा वैभव हे खारेपाटातील तिसरे साप्ताहिक, ते 27 वर्षे चालू असून त्यांच्या सामाजिक  कामाचा विचार करून त्यांना जिल्हा परिषदेने रायगड भूषण पुरस्कार देऊन गौरविले आहे. रायगडचा युवक व कोकणनामा  ही साप्ताहिकेही याच भागातील. कवि, लेखक व नाटककार भ.ल.पाटील लोणघरचे सुपुत्र. कूळकायदा,चौथेरत्नही नाटके विशेष  गाजली.  साहित्यिक  व पत्रकार म.ना. पाटील पेझारीचे.   आदर्श  शिक्षक  म्हणून  राज्य  पुरस्काराने ते सन्मानित झाले होते. मुंबई महापालिकेने महापौर पदक देऊन गौरविलेले  ब.गि.पाटील सुतारपाडा गावचे, आदर्श  शिक्षक  म्हणून   राष्ट्रपतीपदक विजेचे ब.रा. वाघपंजे वाघोलीचे सुपुत्र.  ब्रिटिश काळात न्यायदानात मदत करण्यासाठी ज्यूररचे काम करणारे मैनुद्दीन छापेकर (मैनूशेट याच भागातील).  हिंदू व मुस्लिम समाजात  त्यांना  प्रतिष्ठा  होती.  ब्रिटिश  काळातील खारेपाटातील पहिले  डॉ. वसंत रेगे पोयनाडचे. मुंबई येथील पोर्ट ट्ररस्टचे निवृत्त अधिकारी गोवर्धनशेट मोकल यांनी हाशिवरे परिसरातील शेकडो तरुणांना नोकर्‍या  दिल्यामुळे या परिसराचा  कायापालट झाल्याचे जाणवते.  चरी येथील निवृत्त शिक्षक  रामभाऊ कामत यांची मुले विक्रमवीर ठरली. डॉ सुधाकर कामत* – उहशीीं  ीशिलळरश्रळीीं ळप  घ. ए. च. केीळिींरश्र डॉ. मुरलीधर  कामत (कॅन्सर रोगतज्ज्ञ) ग. रा. कामत प्रा. रुईया महाविद्यालय व पटकथा लेखक  आणि साहित्यिक तसेच  प्रा. उमाकांत कामत. मराठी  विभाग  प्रमुख   पालघर  महाविद्यालय.  खारेपाट विभागात अशीच  नररत्ने जन्मास यावीत व या विभागाचे नाव सातासमुद्रा पलिकडे पोचावेहीच सदिच्छा.

Exit mobile version