बळवंत वालेकर
बाळशास्त्रींचा आदर्श रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी गिरविल्यामुळे पत्रकारितेत या जिल्ह्याचा वरचष्मा राहिला. अलिबाग येथे केशव रावजी आठवले यांनी 1870 साली सत्यसदन व सर्वमित्र हे पहिले साप्ताहिक सुरू करून जिल्ह्यात वृत्तपत्रांचा पाया घातला.
सूर्यास्तानंतर सूर्योदय हा दिनक्रम सतत चालू असला तरी प्रत्येक दिवसाचा वेगळेपणा जाणवतो. त्यामुळे प्रत्येक दिवसाचे स्वागत करण्यास आपण तत्पर असतो. तसेच आपला उत्साह देखील वाढलेला असतो. 26 जानेवारी रोजी भारतात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. 30 जानेवारी रोजी हुतात्मा दिन, 1 मे रोजी महाराष्ट्र दिन, 5 जून रोजी पर्यावरण दिन, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन, 9 ऑक्टोबरला राष्ट्रीय एकात्मता दिन, 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिन. 24 ऑक्टोबर संयुक्त राष्ट्र संघ दिन, 6 डिसेंबर गृहरक्षक दिन साजरा केला जातो. त्याचप्रमाणे 6 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील मराठी भाषिक पत्रकार संघांकडून पत्रकार दिन विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. 190 वर्षांपूर्वी याच दिवशी 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक सुरु केले. म्हणून बाळशास्त्रींना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणतात. भाषाप्रकांड बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर देवगड तालुक्यातील (जि. सिंधुदुर्ग) पोंभुर्ले येथे जन्मले. बाळशास्त्रींमुळे पोंभुर्ले गावाला वृत्तपत्रसृष्टीत वेगळे महत्त्व आहे. येथे बाळशास्त्रींचे राष्ट्रीय स्मारक उभारले असून दरवर्षी येथे पत्रकार दिनाचा मुख्य कार्यक्रम होतो. तसेच पत्रकारितेत उत्कृष्ठ काम करणार्या पत्रकारांना दर्पण पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
कोकण ही नररत्नांची खाण आहे. लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडाकर, डॉ. सी. डी. देशमुख, आचार्य विनोबा भावे इ अनेक विद्वद्रत्ने कोकणच्या लाल मातीत जन्मली. बाळशास्त्री हे त्यापैकी एक आहेत. प्रगल्भ बुद्धिमत्ता, वाचनाची आवड, तीक्ष्ण स्मरणशक्ती व ध्येय शक्तीनेे प्रेरित झालेल्या जांभेकरांचे चौथ्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण पोंभुर्ले यैथे झाले. या हिर्याला त्याच्या गुरुजींनी ओळखले व या हिर्याला कोंदण मिळण्यासाठी त्यास मुंबई येथे पाठवावे असे त्याच्या पाल्यास सुचविले. म्हाणून त्यास मुंबई येथे पाठविले. तेथे प्रखर बुद्धीचे अनेक मित्र त्यास भेटले. तरीही त्यांनी प्रथम क्रमांक सोडला नाही. मराठी व संस्कृत भाषांप्रमाणे इंग्रजी, बंगाली, कानडी गुजराती, पारशी इ. भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळविले. पदवी परीक्षेत प्रथम वर्ग असल्यामुळे व अफाट वाचन छंदामुळे एल्फिंस्टन कॉलेजमध्ये ते प्राध्यापक झाले, व पहिले नेटिव्ह असिस्टंट प्रोफेसर बनले. त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकले. दादाभाई नौरोजी हे त्यापैकी एक होते.
शैक्षणिक कामाबारोबर सामाजिक क्षेत्रात ही त्यांचे मोठे काम आहे. अंधश्रद्धा, बुवाबाजी, महिलांना कमी लेखणे, विधवा स्त्रियांना त्रास देणे, कुमारी मातांना छळणे याविरुद्ध मोहीम उघडण्याचे तरुणांना आवाहन केले. ते बांबे एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी होते. त्यांच्या चोख कारभारामुळे त्यांना बढती मिळून ते नेटिव्ह सेक्रेटरी झाले. शाळा तपासणीसाचे कामही त्यांनी उत्तम केले. शिक्षण शास्त्र व मानसशास्त्राचा दांडगा अभ्यास असल्यामुळे क्रमिक पुस्तकेही त्यांनी तयार केली. बाल व्याकरण, गणितशास्त्र, मानसशास्त्र यावरही त्यांनी पुस्तके लिहिली. त्यांच्या कामावर ब्रिटिश अधिकारी खूष होते. त्यांच्या सामाजिक कामाचा विचार करुन जस्टिस ऑफ पीस ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केले. अन्य पुरस्कारही त्यांना दिले गेले. त्यांना फक्त 42 वर्षांचे आयुर्मान लाभले. कमी कालावधी मिळूनही ते विक्रमवीर बनले.
पत्रकारितेत रायगड जिल्ह्याचा वारसा
बाळशास्त्रींचा आदर्श रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी गिरविल्यामुळे पत्रकारितेत या जिल्ह्याचा वरचष्मा राहिला. अलिबाग येथे केशव रावजी आठवले यांनी 1870 साली सत्यसदन व सर्वमित्र हे पहिले साप्ताहिक सुरू करून जिल्ह्यात वृत्तपत्रांचा पाया घातला. त्यानंतर मुरुड येथे सिंधुयुग्म, अलिबाग येथे मेडिएटर तसेच सद्धर्म दीप तसेच अबला मित्र ही साप्ताहिके चालू झाली. पेण येथे नारायण गणेश मंडलीक यांनी ‘सुधाकर’ माथेरान येथे फ्रामजी मेहता यांनी ‘माथेरान जाटिंग्ज’ तसेच पेण येथून ‘कुलाबा समाचार’, महाड येथून ‘ब्रह्मोदय व राष्ट्रप्रमुख वैजनाथ’ (ता. कर्जत) येथून कुलाबा अलिबाग येथून ‘राष्ट्रतेज व पेझारी’ (अलिबाग) येथून ‘कोकण कृषीवल’ ही वृत्तपत्रे पारतंत्र्य काळात सुरू झाली. पैकी पेण येथील ‘कुलाबा समाचार’ 97 वर्षे चालू होते तर ‘कोकण कृषीवल’ या साप्ताहिकाचे दैनिकात (दै. कृषीवल) रुपांतर झाले असून मुंबई व पुण्याच्या दैनिकांशी स्पर्धा करीत आहे. इतर वर्तमानपत्रे कालौघात बंद पडली. वर्तमानपत्रांचे उदंड पीक भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वसामान्यांच्या विकासासाठी देशाचा कारभार लोकशाही पद्धतीने सुरु झाला. नागरिकांना लेखन स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य तसेच प्रचार स्वातंत्र्य मिळाले. वृत्तपत्रास चौथ्या स्तंभाचे स्थान मिळाले. वर्तमानपत्रांना आर्थिक स्थैर्य लाभण्यासाठी शासकीय जाहिराती मिळू लागल्या. अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना शासनाकडून विविध सुविधा दिल्या गेल्या. म्हणून वर्तमान पत्रांचे उदंड पीक आले. तसेच पत्रकारांची संख्याही वाढली. यात रायगड जिल्हाही मागे नाही. या जिल्ह्यात निर्धार, प्रज्ञा, किल्ले रायगड, आदर्श, जिद्द, कुलाबा मानस, कुलाबा शिवतेज, झुंझार शिक्षक, युगांत, कुलाबा दर्पण, जिवा शिवा, श्री विद्या, अवचितगड, बळवंत वालेकर संपादित कुलाबा वैभव, रायगडचा आवाज, रायगडचा युवक, रायगडची खाण, ब्रिगेडियर, एकात्मता, पनवेल टाईम्स, रसायनी टाईम्स, श्रीवर्धन टाईम्स, कोकणनामा, झुंझारमत, महाड-पोलादपूर टाईम्स इ. वर्तमान पत्रे चालू झाली. त्यापैकी काही बंद पडली आहेत पण किल्ले रायगड, वादळवारा, कर्नाळा, रामप्रहार, पनवेल टाईम्स, रायगड नगरी, रायगड टाईम्स, कर्नाळा , रायगड वृत्तवेध या वर्तमान पत्रांचे दैनिकात रुपांतर झाले. व्रुत्तपत्रांच्या माध्यमातून या जिल्ह्यात शि.म.परांजपे, ना. ना पाटील, ग.भा. पंडित, ह.वा. महाजन, प्रभाकर पाटील, मधुकर भावे, नवीन सोष्टे, राजाभाऊ देसाई, अमर वार्डे हे दिग्गज पत्रकार तयार झाले. अशाप्रकारे अभ्यासू व चोखंदळ पत्रकार तयार व्हावेत हीच दर्पणकारांना (बाळशास्त्रींना) खरी श्रद्धांजली ठरेल !