अंबेने धोक्याची पातळी ओलांडली

पाली व जांभुळपाडा पुलावरुन पाणी,
वहातुक ठप्प, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
पाली-बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यात सलग मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी दि.(21)रोजी अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचा जोर वाढल्याने वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील पाली व जांभुळपाडा पुलावरून पाणी गेले . त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक तासनतास ठप्प झाली होती. खुरावलें आंबा नदी चा पाण्याचा प्रवाह वाढल्याने भैरव रस्ता रहदारी करिता बंद करण्यात आला . तसेच जांभुळ पाडा ते कळंब, जांभुळपाडा ते माणगाव बुद्रुक रस्ता देखील रहदारीसाठी बंद केल्याची माहिती तहसीलदार रायन्नावार यांनी दिली.

पाली व जांभुळपाडा येथे खोपोली- पाली – वाकण रोडवर अंबा नदी पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक बंद केली. खोपोलीवरून पलीकडे व वाकणवरून पलीकडे जाणारी वाहतूक बंद केली होती. पाली अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. तसेच सकाळी कामावर निघालेले चाकरमानी, शेतकरी, व्यवसायिक यांना अडकून पडावे लागले. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला होता. या ठिकाणावरून येणार्‍या प्रवाश्यांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना जनसंपर्क अधिकारी रायगड यांनी दिल्या होत्या. पाली व जांभुळ पाडा नवीन पुलाचे बांधकाम कधी पूर्ण होणार, नेहमीचा त्रास कधी थांबणार असा सवाल जन मानसातून उपस्थित केला जातोय.

पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाली आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाउस सुरु आहे. त्यामुळे सखोल व खोलगट भागात पाणी शिरले आहे. तर नद्या, नाले, दुथडी भरुन वाहत आहेत. येथील गावांना जोडणार्‍या पुलांवरुन पाणी वाहत असल्याने वाहतुकीस अडसर निर्माण झाल्याचे दिसून आले. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे उन्मळून पडत आहेत. तर भुस्खलनाने दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. हवामानखात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे पावसाचा जोर वाढत आहे. अशातच वनाच्छदीत प्रदेश असलेल्या व अधिक पर्जनवृष्टीचा तालुका म्हणून ओळखला जाणार्या सुधागडात पावसाने अक्षरशः धुमाकुळ घातला आहे. आभाळ फाटल्याप्रमाणे सतत कोसळणार्या धुवॉधार पावसाने पाली आंबा नदी पुलाने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे.

अंबा नदीचे पुलावरून पाणी जात असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने महसूल प्रशासन, आपत्ती व्यवस्थापनासह पोलीस प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. व अधिक सतर्क राहावे.
दिलीप रायन्नावर, तहसिलदार

Exit mobile version