लहान मुला मुलींनी घेतला सहभाग
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील अंधार आळीत लहान बच्चे कंपनी साठी पर्यावरण पूरक शाडूच्या मातीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या व गणपतीच्या मुर्त्या तयार करण्याचा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण पूरक शाडूच्या मातीपासून बनविण्यात आलेली मूर्ती पाण्यात लवकर विसर्जित होते. तसेच त्यामुळे पर्यावरण पूरक असे शाडूच्या मातीमुळे पर्यावरणाचे कोणतेही नुकसान होत नाही.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पर्यावरणास किती हानी कारक आहेत, याची माहिती यावेळी मुलांना देण्यात आली. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती न वापरता गावातील मुलांनी शाडूच्या मातीपासुन गणपती तयार करून त्याची विक्री करून घरोघरी त्या शाडूच्या मातीच्या मूर्ती ची पूजा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. अंधारी गिरोबा मंदिर या ठिकाणी काही युवकांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 348 व्या शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने अंधार आळी येथील समीर दळवी व अरुण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांसाठी शाडूच्या मातीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्त्या, गणेशाच्या विविध रूपातील मुर्त्या तयार साचाद्वारे करण्याचा व हाताने कशा पद्धतीने बनवायचे त्याचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक देण्यात आले.
यावेळी लहान मुला मुलींनी हिरीरीने भाग घेत स्वतः शाच्यातून शाडूच्या मातीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्त्या तयार केल्याने, या मुला मुलींना खूप आनंद झाला. त्यांनी सुद्धा मनापासून महाराजांच्या मूर्ती किंवा इतर मूर्ती कशा पद्धतीने बनवायच्या हे प्रत्यक्ष अनुभव आल्यामुळे मुलांच्या चेहर्यावर आनंदी आनंद दिसत होता. यापुढेही असेच पर्यावरण पूरक बहुउपयोगी उपक्रम मुलांसाठी राबविण्यात यावे ही अशी यावेळी मुलांनी विनंती केली.