शर्यती कधी चालू होतायत याचीच पाहत होते वाट
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
जिल्ह्यात जानेवारी ते मे महिना हा बैलगाडी शर्यतीचा हंगाम आहे. जिल्ह्यात पनवेल, उरण, कल्याण, ठाणे, अलिबाग, कर्जत या ठिकाणी बैलगाडा शर्यती जोमात होतात. तसेच बैलगाडा शर्यतीचे शर्यतप्रेमी जिल्ह्यात सर्वत्रच आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून बैलगाडा शर्यतींना असलेली बंदी गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टाने सशर्त उठविल्यानंतर जिल्ह्यातील बैलगाडी शर्यतप्रेमी आनंदून गेले आहेत. पनवेल तालुक्यातील ओवळे गावातील विश्वनाथ तु. मुंगाजी यांच्या परिवारात अनेक पिढ्या बैलांच्या शर्यतीत सहभागी होत आहेत. सध्या त्यांच्या घरातील 90 वर्षांच्या आनंदीबाई मुंगाजी आणि 8 वर्षाची तीर्था मुंगाजी शर्यतीच्या बैलांचे संगोपन करत असून त्यांना या बैलांचा लळा लागला आहे. शर्यती कधी चालू होतायत याचीच सर्वजण डोळ्यात तेल घालून वाट पाहत आहेत. विश्वनाथ यांचा मुलगा रुपेश मुंगाजी यांनी सांगितले की सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवली आणि आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र लगेचच कोरोनाचा उद्रेक झाला आणि जमावबंदी लावली गेली आहे. आमच्या अनेक पिढ्या बैलगाडा शर्यतीत आहेत. बंदी काळातही बैलांचा घरातील सदस्याप्रमाणे सांभाळ केला. आज ना उद्या शर्यतींवरील बंदी उठेल या आशेवर कित्येक बैलगाडा मालक व चालक होते. सशर्त का होईना पण बंदी उठल्याने बैलगाडा चालक, मालक व शर्यत प्रेमी आदींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सध्या विश्वा नावाचा 4 वर्षांचा शर्तीचा बैल घरी आहे. 13 महिन्यांचा असतांना त्याला 26 हजार रुपयांना खरेदी केला. आत्ता त्याची किंमत 15 लाख झाली आहे. या बैलाला 90 वर्षांची आज्जी आनंदीबाई स्वतःच्या हाताने खुराक देते तसेच त्याचा सांभाळ करते. तर 8 वर्षांची तीर्था ही देखील 4 वर्षाची असल्यापासून त्याच्या सोबत खेळते व बागडते. शर्यती बंद असतांना विश्वाचा शर्यतीचा सराव जोरात सुरू आहे. बिनजोड शर्यतीत तो हुकमी एक्का ठरेल. या आधी शाहीर हा महाराष्ट्रातील एक नंबरचा शर्यतीचा बैल मुंगाजी यांचा होता. सध्या तो म्हातारा झाला आहे. त्याला आराम दिला आहे. पनवेल, कल्याण, उरण, कर्जत या ठिकाणी मबिनजोड शर्यतीफ खुल्या मैदानात होतात. तर अलिबागमध्ये समुद्राच्या वाळूवर 2-3 किमीच्या शर्यती होतात. शर्यती बघण्यासाठी हजारो लोक जमतात. विशेष म्हणजे महाराष्ट्रात कुठेही बैल पळवला तरी रायगड जिल्ह्यात व नवी मुंबईत बैल पाळल्यानंतरच त्याची खरी किंमत किंवा प्रतिष्ठा ठरते. त्यामुळे येथील शर्यतींना संपूर्ण महाराष्ट्रात महत्व आहे. बिनजोड शर्यतीत कोणी रोख रक्कम किंवा, हंडा, बादली, कळशी, मेंढा असे पुरस्कार लावतात. इथे पुरस्कार व पैशांपेक्षा प्रतिष्ठा आणि हौस महत्वाची असते. जिल्ह्यात 26 जानेवारीला सर्वात मोठे मैदान होते. देसाई मैदान म्हणून ते प्रसिद्ध आहे. मात्र जमावबंदी मुळे ते होणे शक्य नाही. मात्र कोरोनाची परिस्थिती ओसरल्यावर जिल्ह्यात बैलगाडा शर्यतींचे घुमशान पहायला मिळेल.
विश्वाची महागडी खुराक
विश्वाला रोज 3 लिटर दूध, 6 किलो डाळ व इतर खाद्य लागते. त्याच्या खुराकीचा खर्च दिवसाला जवळपास हजार ते बाराशे रुपये इतका आहे.
- कित्येक वर्षे बैलगाडा शर्यतीच्या बैलांचा सांभाळ करत आहे. या डोळ्यांनी अनेक शर्यती पहिल्या आहेत. आता शर्यती पुन्हा सुरू होतील त्यामुळे आनंदी आहे. नातू व पतवंडे देखील बैलगाडा शर्यतीत आहेत. बैलांचा चांगला सांभाळ करतात. – आनंदीबाई मुंगाजी, शर्यतप्रेमी 90 वर्षीय आज्जी, ओवळे,