। अलिबाग । वार्ताहर ।
मनातले विचार जेव्हा सुचतात आणि ते लिखित स्वरूपात येतात तेव्हा कविता तयार होते. ती कधी गेयात्मक होते आणि त्या विचारांनी समाजातील इतर घटकांना आनंद देते व स्वतःलाही आनंद घेता येतो, हीच खरी कविता होय, असे विचार रायगडचा युवक फाउंडेशनने आयोजित केलेल्या हिराकोट तलावावरील काव्य कट्ट्याचे उद्घाटन प्रसंगी सुनीती धायगुडे यांनी मांडले.
यावेळी कवी जयपाल पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, कायम कवितांशी बांधिलकी ठेवल्याने अलिबागच्या माजी नगराध्यक्षा कै. नमिता नाईक यांनी सांगितले की, अलिबाग तालुक्यातील नवतरुण, तरुणी, ज्येष्ठ कवी यांच्यासाठी एक कट्टा करा. दर महिन्याला काव्यत्व साजरा करा. त्यामुळे दर महिन्याच्या 12 तारखेला काव्य कट्टा सुरू होतो. कोविड-19 मुळे तो बंद झाला होता. पुन्हा अलिबागच्या काव्य रसिकांना आनंद देण्यासाठी याची पुन्हा सुरुवात केली असून या पहिल्या काव्य कट्ट्यासाठी सातारा येथून सुनिता धायगुडे यांचा परिचय अलिबागकर कवींना झाला आहे.
या काव्य महोत्सवात राजेश तळकर, मीनल तवठे, भैरवी जोशी, पूजा पेडणेकर, रश्मी कर्णिक, जयश्री म्हात्रे, सुलभा ठाकूर, तुषार पडवळ, निमिषा म्हात्रे, पद्माकर पवार, तांबोळी, डॉ.जयपाल पाटील, सागर पाटील यांनी आपल्या बहारदार कविता सादर करून आनंदोत्सव साजरा केला.