| माणगाव | प्रतिनिधी |
आगामी खरीप हंगामात बियाणे खरेदी करताना वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करून आणि काळजी घेऊन बियाण्यांची खरेदी करणे गरजेचे आहे, असे आवाहन शेतकर्यांना माणगाव तालुका कृषी अधिकारी रवींद्र पवार यांनी केले आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, बियाणे खरेदी करताना कुणी कितीही चांगलं वाण सांगितलं तर कुणाच्या सांगण्यावर न जाता आपल्या स्वतःच्या शेतात संबंधित पिकात आपल्या गरजा व समस्या काय आहेत व आपण खरेदी करत असलेल्या वाणात आपल्या गरजा पूर्ण करणारी किंवा समस्या निराकरण करणारी वैशिष्ट्ये आहेत का व संबंधित वाणाच्या बियाण्याची आपल्या भागाकरिता शिफारस आहे का, या सर्व बाबीचा विचार करू बियाण्याची खरेदी करणे गरजेचे असते. यासाठी वेळोवेळी गरजेनुसार तज्ज्ञांचा व चांगल्या अनुभवी प्रयोगशील शेतकर्यांचा सल्ला घ्या. आगामी खरीप हंगामात बियाणी खरेदीपूर्वी या सर्व सूचनांचा गरजेनुसार वापर करावा, अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी माणगाव यांच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही ते म्हणाले.