। रसायनी । वार्ताहर ।
कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जन शिक्षण संस्थान या योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाचे ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा’ योजनेतील बार्बर-न्हायी (असिस्टंट हेअर ड्रेसर) या पाचव्या व जे.एस.एस.च्या नवव्या बॅचचे उद्यम आधार नोंदणी प्रमाणपत्र वाटप करून संपन्न झाले. या योजनेत देश भरातील 1 हजार पेक्षाही अधिक प्रधानमंत्री विश्वकर्मा सेंटरच्या माध्यमातून लाखो विश्वकार्मांना 2028 पर्यंत मोफत व्यवसायाभिमुख कौशल्य वृद्धी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या सहा दिवसांच्या प्रशिक्षण वर्गांमध्ये प्रति विद्यार्थी एकत्रित प्रोत्साहन भत्ता 4 हजार रुपयांबरोबरच, मोफत प्रशिक्षण प्रमाणपत्र, प्रत्येकी 15 हजार रुपयांचे विश्वकर्मा किट अथवा व्हाउचर्स बरोबरच कौशल्य वृद्धी प्रशिक्षणासह 5% व्याजदराने 3 लाख रुपयापर्यंतची टप्या टप्याने कर्ज सुविधा देखील प्रशिक्षणार्थ्याना उपलब्ध होणार आहे. तर, आत्मनिर्भर रोजगारक्षम उद्योजक निर्मितीत विश्वकर्मांचा पुढाकार महत्वाचा आहे, असे मत जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉ. विजय कोकणे यांनी व्यक्त केले आहे.